सर्वसामान्यांना परवडणा-या किंमतीत घरे देणा-या म्हाडाने आता कोकणातल्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरातही गृहप्रकल्प योजना सुरू केल्या आहे.
मुंबई – सर्वसामान्यांना परवडणा-या किंमतीत घरे देणा-या म्हाडाने आता कोकणातल्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरातही गृहप्रकल्प योजना सुरू केल्या आहे. समुद्र किना-यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंगुर्ला-कॅम्परोड येथे कोकण मंडळाने १२५ घरे बांधली असून, येत्या २०१४ च्या सोडतीत या घरांचा समावेश केला जाणार आहे.
एकाच ठिकाणी तीन इमारती असून, या इमारतीच्या तिन्ही मजल्याचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. आता चौथा मजला बांधण्याचा आराखडा नगर परिषदेकडे पाठवण्यात आला असून, त्यालाही लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत इमारतींचा चौथा मजलाही बांधून पूर्ण होईल. २०१४ च्या सोडतीत या घरांची सोडत काढण्याचे कोकण मंडळाने निश्चित केले असल्याचे मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी असलेल्या तेथील घरांचे क्षेत्रफळ अनुक्रमे साडेपाचशे, साडेसातशे व एक हजार चौरस फुट आहे. घरांची किंमत येत्या काही दिवसांत ठरणार आहे.
घर बांधून विक्री करण्याचा म्हाडाचा उद्देश आहे. मात्र यापूर्वी काही ठिकाणी घरांना प्रतिसाद मिळाला नसल्याने ही घरे पडून होती. हा अनुभव असल्याने यावेळी कोणत्या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज घेऊनच घरे की भूखंड विक्री असा सावध पवित्रा कोकण मंडळ घेत आहे.
भूखंड विक्रीचा घाट?
कोकणातल्या वेंगुल्र्यानंतर दापोली येथील समुद्रकिनारी घरे बांधण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. पण गृहसंच निर्माण करण्याच्या उद्देशावर पाणी सोडून आता काही ठिकाणी भूखंड विक्री करण्याची योजनाही म्हाडा सध्या आखत आहे. मात्र भूखंड विक्रीची योजना ही विकासकांच्या फायद्यासाठीच आखली जात आहे, अशी टीकाही होत आहे.
कोकण मंडळाने भविष्यातील प्रकल्पासाठी आतापासूनच जमिनी पाहण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे ३२ एकर जागेबाबत प्रतिसाद मिळाला आहे. त्याशिवाय पनवेलजवळच्या रसायनी स्थानकाजवळ एका कंपनीने १०० एकर जमीन विकण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच पनवेल शहरात आठ एकर जागेचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षाच्या सोडतीची तयारी कोकण मंडळाने सुरू केल्याची समजते.