जोपर्यंत माणसे नीतिधर्माने वागत होती तोपर्यंत पृथ्वीवरील ऋतुचक्र नित्यनेमे फिरत होते. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा त्यांच्या ठरलेल्या वेळेत सुरू होत होते. मात्र प्राणिमात्रांची संख्या आणि विशेषकरून बुद्धिजीवी मानवाची पृथ्वीतलावरील संख्या वाढली आणि ऋतुचक्रात फरक पडत गेला. उन्हाळ्यात पावसाळा जाणवू लागला आणि पावसाळ्याचे दिवस कोरडे जावू लागल्याने त्या हंगामातही उन्हाळा भासू लागला. आताचेच उदाहरण घेतले तर सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर हिट जाणवत आहे. त्यामुळे माणसेच म्हणू लागली.. ‘माणसाची नियत बदलली म्हणून निसर्गही बदलला!’ पृथ्वी आहे तशीच आहे. मात्र तिच्यावरील घरांची संख्या वाढली. परिणामी दोन घरांतील जागा कमी झाली. साहजिकच सांडपाण्याच्या निच-याला जागा कमी पडू लागली. तुंबणा-या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती होऊ लागली. परिणामी आजारांचे प्रमाणही वाढू लागले. ज्यावेळी ऋतुमानाचे रहाटगाडे सुरळीत होते तेव्हा पावसाळ्यात येणारे एकच वादळ लोकांना माहीत होते.. चक्रीवादळ. पण आता वादळाचे किती प्रकार झाले आहेत. कोणाही हवामान तज्ज्ञाला सुचेल ते त्या वादळाचे नाव ठरते. फयान वादळ फारच भयाण ठरले.
अमावस्या-पौर्णिमेला येणारी उधाणाची भरती असायची. पण आता त्यात त्सुनामीची भर पडली. पूर्वी मलेरिया, कॉलरा, प्लेग याबरोबरच विषमज्वराचा ताप यायचा, पण आता त्या आजाराचेही किती प्रकार. स्वाइन फ्लू आणि डेंगी किंवा डेंग्यू असे दोन आजार माणसाला जडतात आणि त्यात ते पार हैराण होऊन जातात. दोन्ही आजारांच्या लक्षणात काही बाबतीत साम्य असते. त्यामुळे आजार एक आणि उपचार अनेक होतात. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत काही फरक पडत नाही आणि त्याची गाठ मृत्यूशी पडते. या आजाराचा माणसांना ‘ताप’ होतो. सध्या राज्याला स्वाइन फ्लूचा विळखा पडला असून त्या आजारात दिवसाला पाच मृत्यू होत आहेत, इतकी भयाण परिस्थिती आहे. बदललेले ऋतुचक्र हेच त्याचे मूळ कारण आहे. महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसांत स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला. जानेवारीपासून स्वाइन फ्लूचे चार हजार ८१० रुग्ण आढळले. ६ सप्टेंबपर्यंत बळींचा आकडा ५१९ पर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात या रोगाने यंदा सर्वाधिक म्हणजे ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल पुणे महापालिका क्षेत्रात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यभरात दररोज सरासरी १४ हजार ५८१ जणांची तपासणी करण्यात येत असून, त्यातील दररोज किमान ५३ रुग्णांमध्ये स्वाइन फ्लू या आजाराचे एच१एन१ विषाणू आढळून येत आहेत. या आजाराचे नेमके कारण काय असावे यासाठी राज्यपातळीवर स्वाइन फ्लूबाबत अभ्यास करणारी समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती हा एक उपाय झाला. त्याने परिस्थितीत काही फरक पडत नाही. समिती नेमणे म्हणजे धूळफेक करण्यासारखे आहे. आजवर प्रत्येक प्रकरणात समित्या नेमल्या गेल्या. त्यांचे अहवाल शासनाकडे आले आणि ते लालफितीत अडकून पडले. निसर्गापुढे समितीचाही निरुपाय होतो. राज्यात आतापर्यंत सुमारे १५ लाख, १ हजार, १६४ नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. स्वाइन फ्लूच्या आजाराची लागण रोखण्यासाठी दररोज साधारण ३८३ संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर हे औषध दिले जाते. सध्या राज्यभरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे ५०२ रुग्ण दाखल आहेत. हा आजार केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभर पसरला आहे, ही चिंताजनक बाब आहे. मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग आदी आजार असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झटकन होण्याची शक्यता जास्त असते. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांनाही या आजाराची बाधा लवकर होते.
मुलांना पोषण आहार देऊन त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ऊन-पावसाचा लपंडाव, त्यामुळे तापमानात सातत्याने बदल होत असल्यानेच आजारांनी डोके वर काढले आहे. राज्यात २९ ऑगस्ट रोजी पावसाने थैमान घातल्यानंतर आता आजारांची मालिका सुरू होणार याचे भाकीत तेव्हाच वर्तवण्यात आले होते. पावसाचे आणि गटारांचे पाणी वाहून जाण्यास पुरेशी सुविधा नसल्याने अनेक दिवस साचून राहिलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती झाली. रस्त्यात कुजलेल्या कच-यामुळे सर्वत्र दरुगधी पसरली. त्यामुळे आजाराला पोषक वातावरण निर्माण झाल्याने त्याचे प्रमाण वाढले आहे. औषधे रुग्णांना बरी करतीलच. पण माणसाने आपल्या वृत्तीत बदल करणे आवश्यक आहे. कच-याची योग्य विल्हेवाट, पाण्याचा आवश्यक तितकाच वापर केला तर आजार नियंत्रणात राहू शकतात. याच्याच जोडीला वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.
सध्या झाडांपेक्षा गाडय़ांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वातावरणात प्राणवायूची कमतरता आहे. परिणामी रुग्ण अधिक गंभीर होतो. रुग्णालयात दाखल केलेल्या बालकांना प्राणवायूअभावी डॉक्टरही वाचवू शकले नाहीत. त्यामुळे सध्या गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची आहे. इमारतींची बांधणी नियोजनपूर्वक झाली पाहिजे. निसर्गाला आडकाठी कराल तर तो कधीच माफ करणार नाही. त्याचे परिणाम भोगावेच लागतात.