मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात निष्काळजी दाखवणा-या अभियंत्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे समर्थन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले आहे.
मुंबई – मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात निष्काळजी दाखवणा-या अभियंत्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे समर्थन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले आहे. याच धर्तीवर महापालिकेच्या अन्य विभागांतील कर्मचारी आणि अधिका-यांवरही अशाच प्रकारे जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतर विभागांतील अधिका-यांनाही जबाबदारीने काम करावे लागणार आहे.
मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यातील विलंबाबद्दल विभागीय दुय्यम अभियंत्यांना सुमारे ९० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका खड्डयामागे एक हजार रुपये, असा हा दंड निश्चित करण्यात आला.
कामचुकारपणा करणा-या अभियंत्यांना ‘पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीम’ने चांगलेच पकडले. त्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनधिकृत झोपडय़ा वाढताना त्याप्रकरणी विभागीय सहाय्यक आयुक्तांना जबाबदार मानून दोषी ठरवले जात नाही. मात्र आमच्यावर कारवाई होते, अशी प्रतिक्रिया अभियंत्यांमध्ये उमटली आहे. याचा समाचार घेत महापालिका आयुक्त सीताराम कुंटे म्हणाले की, रस्त्यांप्रकरणी अभियंते आणि अनधिकृत बांधकामाप्रकरणी सहाय्यक आयुक्त यांची तुलना होऊच शकत नाही.
कारण जेव्हा अनधिकृत बांधकाम तोडण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले जाते. पण रस्ते विभागात जाणीवपूर्वक आणि निष्काळजीतून हे प्रकार घडतात, असे स्पष्ट होते. त्यामुळे रस्ते विभागाच्या अभियंत्यांवर कारवाई केली जाणारच. नव्या सिस्टिममुळे त्यांची जबाबदारी निश्चित झाली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे सर्वच विभागांमध्ये जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल. अभियंत्यांवरील कारवाईचे सभागृहनेते शैलश फणसे आणि विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी समर्थन केले असून चांगल्या प्रकारे काम करून घेण्यासाठी कडक धोरण हवेच, असे म्हटले आहे.
मात्र बृहन्मुंबई महापालिका अभियंता संघटनेचे अध्यक्ष आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सावध भूमिका घेत, रस्त्यांवरील खड्डेप्रकरणात स्टॅक समितीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करावी, असे सांगत अभियंत्यांवर कारवाई तातडीने होऊ नये, अशी चाल खेळली आहे.
सामूहिक बदलीच्या पावित्र्यात अभियंते
महापालिकेच्या अभियंत्यावर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईमुळे अभियंत्यांनी आता सामहिक बदलीचा अर्ज देण्याचा पावित्रा घेतला आहे. इंजिनिअरींग हबमध्ये झालेल्या अभियंत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने ही दंडाबाबत नरमाईची भूमिका न घेतल्यास दोन दिवसांत अशाप्रकारे अर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिका अभियंता युनियनचे सरचिटणीस साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिली आहे. या बैठकीला सुमारे १५० अभियंते उपस्थित होते.