आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चात ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली– आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चात ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुक खर्चाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात विचार करत आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर घेतला जाणार असल्याचे समजते. निवडणूक आयोगाचे सदस्य आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची बैठक येत्या चार फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची मर्यादा ३० टक्क्यांनी वाढवण्यासंदर्भात चर्चा आयोगाच्या सदस्यांच्या बैठकीत झाली होती. सध्या लोकसभा निवडणूक लढवणा-या प्रत्येक उमेदवाराची खर्चाची मर्यादा ४० लाख इतकी आहे. ती ५२ लाखपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. तर विधानसभेसाठीची मर्यादा १६ लाखावरून २१ लाख करण्याचा विचार आयोग करत आहे.
निवडणुकीत खर्चाच्या मर्यादेत दर पाच वर्षांनी वाढ केली जाते. निवडणूक आयोगाकडून २०११मध्ये अखेरची वाढ करण्यात आली होती.
गेल्या काही निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांनी सध्या असलेल्या मर्यादेच्या निम्मा खर्च दाखवल्याचे माजी निवडणूक आयुक्त एन.गोपालस्वामी यांनी सांगितले. जर उमेदवारांनी त्यांनी केलेला खरा खर्च दाखवला नाही तर ३० टक्के वाढ करण्याचा उपयोग काय असेही गोपालस्वामी म्हणाले.
दरम्यान, निवडणुकीतील खर्चाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.