निवडणूक आयोगाने पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
लातूर – निवडणूक आयोगाने पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीदरम्यान चुका टाळण्यासाठी आयोगाने अधिका-यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षणानंतर अधिका-यांची परीक्षा होईल. या परीक्षेत अधिका-यांना उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण मिळणे अपेक्षित आहे.
निवडणुका विनातक्रार होण्यासाठी आयोगाने आतापासून तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्हा पातळीवरील अधिका-यांना राज्य पातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. हे अधिकारी जिल्हा ठिकाणी अधिका-यांना प्रशिक्षण देणार आहेत. येत्या २० व २१ सप्टेंबर रोजी हे प्रशिक्षण होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर करेपर्यंत वीस विषयांवर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याच विषयांवर अधिका-यांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यात संबंधित निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून काम पाहणा-या अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी प्रकाश खपले यांनी दिली. यात किमान पन्नास टक्के गुण मिळविणे बंधनकारक असून परीक्षेचा अहवाल आयोग सरकारकडे सादर करणार असल्याचे खपले यांनी सांगितले.