लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला तब्बल ४५ कोटी लोकांनी भेट दिली.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला तब्बल ४५ कोटी लोकांनी भेट दिली.
२००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान क्षणार्धात कोसळणारे निवडणूक आयोगाचे http://eciresults.nic.in हे संकेतस्थळ यंदाच्या निवडणुकीत मात्र चांगलेच अपडेट होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी या संकेतस्थळाला तब्बल ४५ कोटी लोकांनी भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. एका दिवसात कोणत्याही संकेतस्थळा भेट देण्याचा हा विक्रमच मानला जात आहे.
भारतातील आतापर्यंत कोणत्याही संकेतस्थळाला एका दिवसात एवढ्या हिट्स मिळालेल्या नाहीत. आयोगाने यावेळी प्रत्येक राज्य आयोगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पाच तज्ञ, तर दिल्लीतील मुख्यालयात बारा तज्ञ नेमले होते. त्यामुळे विश्वसनीय मनुष्यबळ आणि योग्य नियोजनामुळे हे संकेतस्थळ सर्वांत यशस्वी ठरल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
अपडेट ठेवण्यासाठी या अधिका-यांनी ९८९ मतमोजणी केंद्राशी कायम संपर्कात राहून आणि १० लाख २९ हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची इत्यंभूत माहिती घेऊन हे संकेतस्थळ अपडेट केले.