राज्यात दहावी आणि बारावीचे पेपर तपासणा-या शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याचा निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच निर्णय घेतला.
मुंबई – राज्यात दहावी आणि बारावीचे पेपर तपासणा-या शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याचा निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच निर्णय घेतला. परंतु हा निर्णय घेऊन काही दिवस उलटत नाही तर आयोगाकडून राज्यातील अनेक मुख्याध्यापकांना पेपर तपासणा-या शिक्षकांनाही निवडणुकीचे काम देण्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षक सध्या संभ्रमावस्थेत आहेत.
दरम्यान, पेपर तपासणीचे काम करणा-या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिका-यांनी निवडणूक आयोगाकडे चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.
राज्यात सध्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असून येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामात जर शिक्षकांना आणि पेपर तपासणी करणा-या शिक्षकांना सामील करून घेतले तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे या शिक्षकांची आणि या शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आला होता. सोमवारी मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षकांना दोन मे रोजी सुरू होणा-या निवडणूक कामांच्या प्रशिक्षणात सामील होण्याचे पत्र देण्यात आले आहे.
शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापकांनाही निवडणूक कामांच्या प्रशिक्षण शिबिरात सामील होण्याचे पत्र आले आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मात्र त्यांनी आमचे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे आता आम्ही रजिस्टर पद्धतीने या संदर्भात पत्र पाठवणार आहोत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. – प्रशांत रेडीज, प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ