निष्पक्षपणे पारदर्शकतेने निवडणूका घेण्यासाठी आम्ही कटिबध्द आहेत असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
नवी दिल्ली – वाराणसीत नरेंद्र मोदी यांना परवानगी नाकारल्यानंतर भाजपने तेथे आंदोलन सुरू केले. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावापुढे निवडणूक आयोग झुकणार नाही, अशा शब्दात मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एम. संपथ यांनी भाजपची खरडपट्टी काढली. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मोदी यांच्या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाराणसीतील रॅलीला परवानगी नाकारल्यानंतर भाजपने जोरदार धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एम. संपथ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आयोगाची बाजू मांडली. वाराणसी मतदारसंघात भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला परवानगी नाकारण्याचा निर्णय योग्यच असल्याचे समर्थन आयोगाने केले.
भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगावर जहाल शब्दात केलेल्या टीकेने निवडणूक आयोग व्यथित झाला. आयोगाच्या नि:पक्षपातीपणाबाबत भाजप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर संपथ म्हणाले की, सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊनच रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
या प्रकरणात सुरक्षितता आणि सोयीचा भाग लक्षात घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा स्तरावर हा निर्णय घेण्यात आला, असा खुलासा संपथ यांनी केला. जिल्हा दंडाधिकारी आणि त्यांच्या पथकाने हा निर्णय घेण्यापूर्वी सुरक्षिततेबाबत तज्ज्ञांचा सल्ला मागितला होता. त्यामुळे जिल्हा स्तरावर घेतलेल्या या निर्णयात फेरबदल अशक्य आहे. कारण सुरक्षितता आणि व्यक्तीच्या जीवनाशी निगडित हा प्रश्न आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला, असे संपथ यांनी सांगितले.
आम्ही कर्तव्य बजावत असताना कोणत्याच राजकीय पक्षाला घाबरत नाही. राज्यघटनेच्या अंतर्गत निवडणूक आयोग बनला आहे. नि:पक्षपाती, निर्भयपणे निवडणुका घेण्यासाठी घटनेने आयोगाला परवानग्या दिल्या आहेत. निवडणूक कायदा, आचारसंहिता अंमलात आणण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगावर आहे, असेही ते म्हणाले.