जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या काळात मदत व पुर्नवसन कार्यात कोणताही अडथळा येणार नसल्याचे मुख्य निवडणुक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी सांगितले.
श्रीनगर– महापुराचा फटका बसलेल्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दिवसभर राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर यासंदर्भातील पुढील चर्चा दिल्लीत केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणुकीच्या काळात मदत व पुर्नवसन कार्यात कोणताही अडथळा येणार नसल्याचे मुख्य निवडणुक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी सांगितले.
राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आयोगाकडे केली आहे. तर या उलट सत्तेतील सहकारी काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या पीडीपीने या वर्षाअखेरीस निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
राजकीय पक्षांच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेमध्ये काहींनी निवडणुका निश्चित वेळेतच घेण्याची तर काहींना पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र यासंदर्भात आम्ही दिल्लीत जाऊन चर्चा करु आणि अंतिम निर्णय घेऊ असे मुख्य निवडणुक आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचे संपत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.