निवडणुकीदरम्यान जाहीर होणा-या जनमत चाचण्या सदोष, विश्वासार्हतेचा अभाव असलेल्या व छुपे हितसंबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक फेरफार करून तयार केलेल्या असतात.
नवी दिल्ली – निवडणुकीदरम्यान जाहीर होणा-या जनमत चाचण्या सदोष, विश्वासार्हतेचा अभाव असलेल्या व छुपे हितसंबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक फेरफार करून तयार केलेल्या असतात, असे सांगून या जनमत चाचण्यांवरील निर्बंधाबाबत निवडणूक आयोगाच्या मताशी काँग्रेसने सहमती व्यक्त केली आहे.
जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याबाबत गेल्या महिन्यात होणारी चर्चा सरकारने स्थगित केल्यानंतर निवडणूक आयोगाने जनमत चाचण्यांबाबत देशातील विविध पक्षांकडे विचारणा केली होती. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने जनमत चाचण्यांवर बंदी घालण्यासाठी सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला होता. मात्र, याबाबत आयोगाने विविध पक्षांशी नव्याने विचारविनिमय करावा, असे सांगत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.
जनमत चाचण्यांसंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला ३० ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात आपला दृष्टिकोन मांडला आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या जनमत चाचण्या प्रसिद्ध करण्यावर निर्बंध असावेत, या निवडणूक आयोगाच्या मताशी काँग्रेसने सहमती व्यक्त केली आहे.
या जनमत चाचण्या एक तर वैज्ञानिक नसतात, त्याच प्रकारे त्या घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नसते, असे अधिकृत मत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) विधी आणि मानवी हक्क विभागाचे चिटणीस के. सी. मित्तल यांनी काँग्रेसच्या वतीने व्यक्त केले आहे.
जनमत चाचण्यांमुळे लोकशाही संस्थांना बळकटी मिळत नसून ब-याच वेळा त्या सदोष असल्याचे व बहुसंख्य मतदारांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने या चाचण्यांवर निर्बंध घालण्यासाठी उचललेल्या पावलांचे आम्ही स्वागतच करत आहोत, असे मित्तल यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने या जनमत चाचण्यांवरील निर्बंधांसंदर्भात देशातील प्रमुख पक्षांकडे विचारणा करून त्यांचे याबाबतचे मत २१ ऑक्टोबपर्यंत आयोगाला कळवण्यास सांगितले होते. सध्या मतदान सुरू होण्यापूर्वीच्या ४८ तासांमध्ये जनमत चाचणीवर निर्बंध लागू आहेत.