मतदारांची दिशाभूल थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली असून जाहीरनामा बनवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे बनवण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली- निवडणुकीचा मोसम सुरू होताच मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनांची खैरात सुरू होते. आता मतदारांची दिशाभूल थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली असून जाहीरनामा बनवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे बनवण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक जाहीरनाम्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व राज्य निवडणूक आयोगाला व निवडणूक अधिका-यांना पाठवली आहेत.
यंदा निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची छाननी करण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी जाहीरनामा प्रकाशित केल्यास त्याच्यावर निवडणुकीचे बंधन राहील, असेही आयोगाने सांगितले. राज्यघटनेशी विसंगत बाबींना जाहीरनाम्यात स्थान देण्यास विरोध करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य जपले पाहिजे. तसेच मतदारांवर प्रभाव टाकणारी आश्वासने देऊ नयेत, असे निवडणूक आयोगाने बजावले आहे.
जाहीरनाम्यात पारदर्शकता बाळगण्यासाठी आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आर्थिक तरतूद कशी करणार याचा तपशील द्यावा. तसेच पूर्ण होणारी आश्वासने मतदारांना दाखवावीत, असेही आयोगाने म्हटले आहे.