निवडणुकांसाठी प्रदेश काँग्रेस संपूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई- केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली. मात्र, निवडणुकांसाठी प्रदेश काँग्रेस संपूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
तृणमूल काँग्रेसने यापूर्वी पाठिंबा काढला म्हणून तर आता द्रमुक पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीमधून बाहेर पडल्याचा दाखला देत मध्यावधी निवडणुकांचे भाकीत केले जात होते. आता तर कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचेही कारण पुढे केले जात आहे. मध्यावधी निवडणुकीच्या चर्चा आणि त्याबद्दलची भाकिते सुरू होऊन आता एक वर्षाचा काळ लोटत आला आहे. त्यामुळे या भाकितांमध्ये काही तथ्य नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या २२ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या २२ मतदारसंघाचा आढावाही घेण्यात आला आहे. या बाबत विचारले असता, आघाडीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.