योगायोग म्हणा वा काही गेले काही दिवस फेसबुकवर आणि व्हॉट्सअॅपवर एक ‘सुविचार’ पोस्ट केला जातोय. ‘बापू अर्थात महात्मा गांधीजींची तत्त्वे समजून घेण्यासाठी आपल्याला मुन्नाभाईकडून शिकावे लागते हे वर्तमानाचे दुर्दैव आहे..’ तुम्हाला काय वाटतं?
योगायोग म्हणा वा काही गेले काही दिवस फेसबुकवर आणि व्हॉट्सअॅपवर एक ‘सुविचार’ पोस्ट केला जातोय. ‘बापू अर्थात महात्मा गांधीजींची तत्त्वे समजून घेण्यासाठी आपल्याला मुन्नाभाईकडून शिकावे लागते हे वर्तमानाचे दुर्दैव आहे..’ तुम्हाला काय वाटतं?
बोले तो मुन्नाभाई आला आणि बापू एकदम हिट झाले.. राजकारणासाठी नको तितके आणि नको तसे वापरले गेल्यामुळे बापूंच्या विचारसरणीचा मूळ आशय बाजूला पडून नव्हे संपूर्णपणे विस्मरणात जाऊन, त्यांची प्रतिमा फक्त भिंतीवर टांगण्यासाठी, साधेपणा दाखवणारा त्यांचा पोशाख फक्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी आणि आचार-विचार टांग मारण्यासाठीच आहेत अशी नव्या पीढीतील मम्मी-पप्पांची आणि तरुणाईची समजूत झाली असतानाच मुन्नाभाई आला, त्याने बापूंना पाहिले, बापूंचे विचार आचरणात आणले (चित्रपटाच्या पडद्यापुरते का होईना), त्याच्यामुळे आजच्या तरुणाईला समजले, भावले आणि बापू तो एकदम ब्रँडनेम बन गये. बोले तो बंदा रुपय्या.
साध्यासुध्या सर्वसामान्य माणसांतील आत्मसन्मानाची तेजस्वी शलाका बापूंनीच दाखवलेल्या सत्याग्रहाच्या, गांधीगिरीच्या मार्गामुळे झळाळून उठली आणि अनेकांना बापूंच्या सत्याग्रहाची महती पटली नाही तरी राजकुमार हिरानीने पडद्यावर साध्यासोप्या शब्दांत आणि दृश्यांतून दाखवलेली गांधीगिरी एकदम पटून गेली.
सरळपणे सांगून, प्रेमाने समजावूनही न ऐकणा-या, रेडय़ासारख्या मस्तवाल माणसाला माणसात आणण्यासाठी विनम्रतासे गुलाबपुष्प द्यायची की तो विरघळायलाच हवा..
हिरानीने दाखवलेली ही गांधीगिरी पब्लिकला भावली त्यात फारसे नवल नाही. पण वास्तवात काय होतं? सरकारी खात्यात कुठल्याही टेबलावर बसून पदोपदी अडवणूक करणा-या, नियमांचे जंजाळ उभे करून न्याय नाकारणा-या, लाच मागणा-या, अनाचार करणा-या, रस्त्यावर पचापच थुंकणा-या, कुठलेही नियम आपल्यासाठी नाहीतच अशा मग्रुरीत वावरणा-या निर्लज्जांच्या जमातीला या गुलाबपुष्पांचे काहीही वाटत नाही.
आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत घडलेली बुधवारचीच गोष्ट घ्या. या महापालिकेत वर्षानुवर्षे कामावर लेट येणा-या, लेटलतिफी हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे अशा थाटात वावरणा-या कर्मचा-यांना महापौर, उपमहापौरांनी कार्यालयाच्या प्रवेशदारातच गुलाबपुष्प दिली. अर्थात कधीच कामावर वेळेत न येणा-या या कर्मचा-यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करावी यासाठी महापौर आदींना तास-दीड तास ताटकळावे लागले. शिवाय हे कर्मचारी ना ओशाळले ना खजिल झाले ना त्यांच्या डोक्यात या गांधीगिरीने काही प्रकाश पडला.
उलट, आम्ही उशिरापर्यंत थांबून काम करतो, साइटवर जाऊन येतो, मग कार्यालयात यायला उशिर होणारच, अशी गुरकावणीची भाषा या कर्मचा-यांच्या संघटनेने केली. ‘सेतू’ कार्यालयातील मंडळी कुठल्या साइटवर जाऊन येतात?, उशिरा कामावर येणा-या मंडळींना काम संपेतो (खरोखरीच काम केलं तर) आणि कामावर आल्यावरही चहापाणी, कुचाळक्या, अमर्याद लंच टाइम असा सगळा खेळखंडोबा हिशोबात घेतला तर निघायला उशिर होणार यात वेगळं ते काय?
आयुक्तांपासून वरिष्ठ अधिका-यांपर्यंत सारेच गुलाबपुष्पांचे मानकरी ठरल्यामुळे खरे तर या मंडळींकडून आत्मपरीक्षण अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रत्येकाने जमेल तशी सफाई दिली. उशिरा येत असल्याबद्दल कोणीही दिलगिरी व्यक्त केली नाही उलट, अरेरावीची भाषाच केली. कल्याण महापालिकेतील याच मंडळींना बायोमेट्रीक हजेरी यंत्रांवर खरी वेळ नोंदवली जाते आणि पगार कापला जातो यामुळे पालिकेत बसवलेल्या यंत्रांचीच काही महिन्यांपूर्वी साफ वाट लावली आहे. अशा निर्लज्जांना गुलाबांची भाषा कशी समजणार?गुलाब आणि गांधीगिरी दोन्ही येथे सपशेल फेल गेले.!!