ठाकरे आणि अत्रे कुटुंबाचा जुना स्नेहसंबंध आहे. मधल्या काळात काही कारणाने हे संबंध बिघडले होते. पण त्यामुळे आमचं परस्परांवरील प्रेम मात्र कमी झालं नाही. बाळासाहेबांना मी नेहमीच कलाविश्वात मग्न झालेलं पाहिलं आहे. ते मला बहीण मानत असत. अखेपर्यंत ते आपल्या बहिणीवर करावी तशी माया माझ्यावर करत राहिले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने बंधुरायाला निरोप देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मनाला धक्काच बसला. त्यांच्या आजारपणाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वाचत, ऐकत होते. पण ते यातून बरे होतील, असं वाटलं होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. त्यांच्या जाण्याने मनात अनेक आठवणींच्या लाटांनी काहूर माजवलं आहे. त्यापैकी काही येथे नमूद कराव्यात, असं वाटतं. ठाकरे कुटुंबीयांशी आमचे जुने स्नेहसंबंध आहेत. माझे वडील आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढले. अर्थात त्यांची त्या आधीपासून मैत्री होती. प्रबोधनकारांचा इतिहासाचा अभ्यास अफाट होता. त्यामुळे आचार्य अत्रे त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांच्या सामाजिक चळवळींमुळेही पप्पांचे आणि त्यांचे सूर जमले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात खांद्याला खांदा लावून लढताना या दोघांची मैत्री दृढ झाली. पुढे गरसमज होऊनही मैत्री तुटेपर्यंत ती कायम होती.
१९४० मध्ये पप्पांनी (आचार्य अत्रे) नवयुग साप्ताहिक सुरू केलं. त्यामध्ये ते ‘अत्रे उवाच’ नावाचं सदर लिहीत असत, तर दत्तू बांदेकर रविवारचा मोरावळा लिहीत असत. त्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून नावारूपास येत होते. नुकतेच ते व्यंगचित्र काढू लागले होते आणि त्याची बरीच चर्चा होऊ लागली होती. त्यावेळी फ्री प्रेसमध्ये त्यांची व्यंगचित्रं प्रसिद्ध होत असत. या कार्टून्सना संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळत होती. आचार्य अत्रे यांना त्यांचं कौतुक वाटत असे. दरम्यान संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे यांनी ‘नवयुग’च्या पहिल्या पानावर व्यंगचित्र काढावं, असं पप्पांनी सुचवलं. बाळासाहेबांनीही ते मानलं आणि ते तत्कालीन घडामोडींचा आढावा घेणारं व्यंगचित्र नवयुगसाठी काढू लागले. ते त्यांच्या घरून आणण्याची कामगिरी पप्पांनी माझ्यावर सोपवली होती. त्यावेळी बाळासाहेब शिवाजी पार्कला रानडे रोडवर राहत असत. आमचा अंक शुक्रवारी तयार होई. त्यामुळे व्यंगचित्र आणण्यासाठी मला बुधवारी ठाकरे यांच्याकडे जावं लागत असे. ते आल्यावर त्याचा ब्लॉक तयार होऊन मग तो छपाईसाठी जात असे. कार्टून आणण्यासाठी मी ठाकरे यांच्या घरी गेले की, प्रबोधनकार माझं हसून स्वागत करत असत. आतमध्ये बसलेल्या बाळासाहेबांना उद्देशून ते म्हणत, ‘बाळ, नानी आली रे ! त्या घराच्या कोपऱ्यातील एका खोलीत बसून बाळासाहेब ठाकरे चित्रं, व्यंगचित्रं काढण्याचं काम करत असत. ती खोली हाच त्यांचा स्टुडिओ होता. केव्हाही गेलं तरी बाळासाहेब चित्र काढण्यात तल्लीन झालेले असत. अशा वेळी आजूबाजूच्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष जात नसे. कार्टून काढण्यात ते मग्न झालेले असत. कार्टून आणायला गेलं की माझ्याकडे कार्टून देत म्हणत, ‘बघा, पसंत आहे का? त्यांचे धाकटे बंधू श्रीकांतही चित्र काढत असत.
कालांतराने बाळासाहेब यांच्या कामाचा व्याप खूप वाढला. देशभर त्यांचं व्यंगचित्रकार म्हणून नाव झालं होतं. ते कामात व्यस्त झाल्यावर श्रीकांत ठाकरे ‘नवयुग’साठी कार्टून काढू लागले. केव्हाही गेलं तरी बाळासाहेब आपल्या कामात मग्न असत. त्यांचं आयुष्य त्यांनी फक्त कलेला वाहून घेतलं होतं. त्यावेळी पाहिलेली त्यांची उंच, सडपातळ मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. हा माणूस पुढं एवढा मोठा पक्ष काढेल, राष्ट्रव्यापी राजकारण करेल, असं त्यावेळी त्यांच्याकडे पाहून वाटलंही नव्हतं.
पुढच्या काळात गरसमज झाल्यामुळे आचार्य अत्रे आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध बिघडले. इतिहास संशोधक न. र. फाटक यांनी त्या काळात झाशीच्या राणीबद्दल अर्वाच्च्य उद्गार काढले होते. त्यामुळे माझे वडील खूप संतापले. ज्या झाशीच्या राणीने ब्रिटिशांविरुद्ध एवढी लढाई दिली तिच्याबद्दल चिखलफेक झालेली पप्पांना सहन झालं नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे कार्टून काढणाऱ्या श्रीकांत ठाकरे यांना एक विशिष्ट कार्टून काढायला सांगितलं. घोडय़ावर बसून झाशीची राणी आवेशाने लढायला जाते, असं चित्र आणि खाली कोपऱ्यात न. र. फाटक पानाची पिंक थुंकतात; पण ती त्यांच्याच अंगावर पडते, असं कार्टून काढावं, असं पप्पांनी श्रीकांत ठाकरे यांना सांगितलं. तसा निरोप घेऊन मी ठाकरे यांच्या घरी गेले. त्यावेळी श्रीकांत म्हणाले, ‘न. र. फाटक यांचं मत तेच आमचंही मत आहे. मी असं कार्टून काढणार नाही. यापुढे तुम्ही आम्हाला कार्टूनसाठी विषय सांगू नये. आम्ही काढू त्या विषयावरील कार्टून तुम्ही छापा.’ त्यांच्या त्या उत्तराने मी रिकाम्या हाती घरी परत आले. त्यावर पप्पा म्हणाले, ‘मी सांगितलं तेच कार्टून ‘नवयुग’मध्ये प्रसिद्ध होणार.’ असं म्हणून त्यांनी दुस-या एका व्यंगचित्रकाराकडून त्यांना हवं होतं तसं कार्टून काढून घेतलं. यातून अत्रे आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध दुरावल्यासारखे झाले. यातूनच ‘मार्मिक’मध्ये पप्पांच्यावर टीका करण्यात आली. अर्थात, त्यामध्ये बाळासाहेब कोठेही नव्हतेच.
या घटनेला बरीच वष्रे लोटली. पुढे माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात पप्पांबरोबर लढणा-या कॉ. डांगे यांनी १९६९च्या जुलै महिन्यात खोटं मृत्यूपत्र तयार केलं. त्याद्वारे पप्पांनी त्यांची सर्व संपत्ती महाराष्ट्राला देऊन टाकल्याचं लिहिलं होतं. हे मृत्यूपत्र वाचून ‘उदारते तुझं नाव अत्रे’ असा अग्रलेख लिहिण्यात आला. वास्तविक, ‘महाराष्ट्र’ पेपर्सची मालकी ही एकटय़ा पप्पांची नव्हती. असं काही झालेलं नाही, असं आम्ही ओरडून सांगत होतो; पण कोणी ते मानायला तयार नव्हतं. अशा वेळी बाळासाहेब ठाकरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला बहीण मानून ते मला भेटायला आले. ‘मी तुमची बाजू घेतो’ असं म्हणाले. कम्युनिस्टांचं राजकारण कसं असतं ते बाळासाहेबांनी ओळखलं होतं. त्यातूनच त्यांनी माझी बाजू घेतली आणि पुढे बऱ्याच काळानंतर हा लढा आम्ही जिंकलो. त्याबद्दल महाराष्ट्रातून आमचं अभिनंदन करण्यात आलं. हा विजय आमचा होता, तसाच तो ‘मार्मिक’चाही होता. त्यामध्ये बाळासाहेबांनी दिलेलं योगदान फार मोठं होतं. याबद्दल मी बाळासाहेबांची कायम कृतज्ञ राहीन. मी आणि माझे पती व्यंकटेश पै यांचं नाव पुन्हा उजळण्यात बाळासाहेबांचं योगदान मोठं आहे. त्यांचं हे प्रेम कायम राहिलं. मधली काही वष्रे मतभेदाची गेली असली तरी इतक्या वर्षानंतर पुन्हा भेटताना बाळासाहेबांनी त्याचा उल्लेखही कधी केला नाही. अर्थात, त्यावेळी झालेल्या गरसमज प्रकरणात बाळासाहेब कुठेच नव्हते. वरळी मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असा आग्रह मला बाळासाहेबांनी केला होता. पण ‘मराठा’ हे कोणत्याही पक्षाचं वर्तमानपत्र नव्हतं. शिवाय मलाही राजकारणात येण्याची फारशी इच्छा नव्हती. त्यामुळे नम्रपणे मी बाळासाहेबांना नकार दिला.
वरळीला आचार्य अत्रेंचा पुतळा उभा करण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा वाटा फार मोठा आहे. या पुतळ्यासाठी काँग्रेसचं सरकार जागा देत नव्हतं. पुढे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यावर बाळासाहेब ठाकरे, जोशी, प्रमोद नवलकर यांनी पुढाकार घेऊन हा पुतळा उभा केला. या सगळ्यामध्ये मधली भांडणं कुठल्या कुठं विरून गेली. पुन्हा मैत्री, आपुलकी, स्नेह निर्माण झाला. नंतरच्या काळात बाळासाहेबांशी माझा फारसा संबंध राहिला नाही; पण मायेनं बहीण म्हणून त्यांनी फार मोठा आधार दिला. त्याचा विसर मला कधीच पडणार नाही. ‘कोणतीही अडचण आली किंवा कसलंही संकट आलं तरी हक्कानं बोलाव,’ असं बाळासाहेबांनी मला सांगितलं. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं काम खूप मोठं आहे. शिवसेना काढणं हे सोपं काम नव्हतं. त्यादरम्यान सर्वत्र काँग्रेसचा जोर होता. अशा वेळी मराठी माणसाचे हक्क मागण्यासाठी, इतर प्रांतातील लोकांनी बळकावलेल्या जागा मराठी माणसाला मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी जो लढा दिला त्याला खरोखरच तोड नाही. सर्व शक्ती त्यांनी पणाला लावल्याने शिवसेना बळकट झाली. त्याचं सर्व श्रेय बाळासाहेबांनाच द्यावं लागेल याला कोणताही प्रत्यवाय नाही. महाराष्ट्रातील जनतेनं उत्स्फूर्तपणे त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ ही पदवी बहाल केली. बाळासाहेब समोर असले की, त्यांच्यापुढे मोठमोठी माणसं नतमस्तक झालेली मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली आहेत. नंतर ते जराजर्जर झाले असले तरी त्यांचं नाव उच्चारलं तरीही एक बलशाली असा नेता डोळ्यांसमोर उभा राहायचा. माझ्या एक-दोन कामांसाठी मी काही वेळा ‘मातोश्री’वरही गेले होते. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांची माझ्यावर खूप माया होती. माझं लेखन ते वाचत असत. एकदा मला त्यांनी बापटांची ‘पानिपतचा रणसंग्राम’ ही कादंबरी दिली आणि म्हणाले, ‘यामध्ये लालन बैरागिणीची प्रेमकथा आहे. ती वाच आणि त्यावर कादंबरी लिही.’ ‘नवयुग’ मधून मी या विषयावर क्रमश: कादंबरी लिहिली. इतिहासातील ती एक अपूर्व प्रेमकहाणी होती. बाळासाहेब तुरुंगात गेले तेव्हा अनेक पुस्तकं बरोबर घेऊन गेले होते. त्यामध्ये माझी ‘लालन बैरागिणी’ही होती, हे बाळासाहेबांनीच मला नंतर सांगितलं.
नंतरच्या काळात मी साहित्यविश्वातच रमले. त्यामुळे राजकारणाशी माझा संबंध राहिला नाही; पण आजही बाळासाहेबांचा फोटो पाहिला की त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात निर्माण होते आणि मी त्यांना मनोमन वंदन करते. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व अजून राहायला हवं होतं. पण, नियतीला ते मान्य नसावं. त्यांच्या जाण्याने मनात असंख्य आठवणींना पूर आला आहे. त्यांनी शेवटपर्यंत मला बहीण मानून प्रेम केलं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मोठा भाऊ गमावल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. त्यांच्या कामगिरीचं मोल कशानेच होऊ शकणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचं नाव नेहमीच अजरामर राहील.