शासनामार्फत निराधारांना आधार देण्यासाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांसाठी 2012-13 या वर्षासाठी 8 कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान संजय गांधी शाखेकडे प्राप्त झाले आहे
सिंधुनगरी – शासनामार्फत निराधारांना आधार देण्यासाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांसाठी 2012-13 या वर्षासाठी 8 कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान संजय गांधी शाखेकडे प्राप्त झाले आहे. या माध्यमातून सुमारे 19 हजार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या अनुदानातून लाभ दिला जाणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत 5 हजार 400 लाभार्थी असून, 3 कोटी 39 लाख 62 हजार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत 6 लाख 813 लाभार्थ्यांसाठी 2 कोटी 55 लाख 30 हजार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेमध्ये 6 हजार 157 लाभार्थ्यांसाठी 1 कोटी 36 लाख 30 हजार, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत 17 लाभार्थ्यांसाठी 6 लाख 51 हजार, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या 504 लाभार्थ्यांसाठी 11 लाख 40 हजार व इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगासाठी अपंग निवृत्ती वेतन योजनेतून 112 लाभार्थ्यांसाठी 14 लाख 20 हजार एवढे अनुदान उपलब्ध झाले आहे.
या योजना राज्य शासन तर काही केंद्र शासनाकडून राबविल्या जातात. तर काही राज्य व केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरीत्या राबविल्या जातात. यामध्ये वृद्ध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती, निराधार विधवा अशा लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजना राबवल्या जातात. जुलैअखेर सर्व योजनांतर्गत 19 हजार 3 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.
या सर्व योजना स्थानिक पातळीवर महसूल यंत्रणेमार्फत राबविल्या जातात. प्रत्येक योजनेच्या अटी व निकष पूर्ण करणा-या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जातो. या विविध योजना अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी योजनांमधील त्रुटी दूर करून सातत्याने नवनवीन सुधारणा करण्यात येत आहेत. शासनाकडून दिल्या जाणा-या या योजनांचा लाभ जास्तीत जास्त निराधारांनी घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.