केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यंदाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात १४५व्या स्थानावर विराजमान झालेल्या पंचवीस वर्षीय चिन्मय पंडितला समाजसेवेसाठी स्वत:ला झोकून द्यायचं आहे. यूपीएससी हा प्रशासकीय सेवेचा आणि पर्यायाने समाजसेवेचा उत्तम पर्याय असल्याचे चिन्मयचे ठाम मत आहे. ही परीक्षा सोपी नसली तरी कठीणही नाही, अभ्यासाचे काटेकोर नियोजन पाळल्यास यशाचे शिखर सर करता येते, असे चिन्मय सांगतो.
इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असताना यूपीएससीची परीक्षा देणे कसे सुचले?
मी २००९मध्ये पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ ‘टेक्नॉलॉजी’मधून ‘इंडस्ट्रीअल इंजिनीअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात असताना ‘कॅम्पस सिलेक्शन’मधून ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’ या कंपनीत नोकरी मिळाली. नोकरीत औपचारिकरीत्या रुजू होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असताना २००९ मध्ये ‘यूपीएससी’चे निकाल लागले. अनिकेत मंडणगणे या तरुणाने भारतातून २९ वा आणि राज्यातून पहिला येण्याचा मान पटकावला. अनिकेतने अविनाश धर्माधिकारी यांच्या चाणक्य मंडळातून ‘यूपीएससी’ची तयारी केली होती. या दोघांच्या प्रेरणेने आपणही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी, असे मी तेव्हा ठरवले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी नोकरी सांभाळून करता आली का?
खरं तर नाही, परीक्षेचे स्वरूप आणि विषयाचा आवाका पाहता नोकरी करून अभ्यास करणे शक्य नव्हते. एक वर्षानंतर नोकरीचा राजीनामा दिला. विषय समजून घेतले. वेळेचे नियोजन केले आणि मे २०११ ते २०१२ या एक वर्षाच्या काळात केवळ यूपीएससीचीच तयारी केली. आजूबाजूला घडणा-या गोष्टींवर बारीक नजर ठेवली. त्याचा अभ्यासच सुरू केला. वैकल्पिक विषयातील इतिहास आणि समाजशास्त्र या दोन विषयांची तयारी सुरू केली. दररोज चार वृत्तपत्रे वाचून त्यावरून नोट्स काढणे नित्यनेमाचे होते.
महिंद्रा आणि महिंद्रासारख्या कंपनीतील नोकरी सोडल्याने घरच्यांचा रोष सहन करावा लागला का?
माझ्या आईची इच्छा होती की, मी प्रशासकीय सेवेत रुजू व्हावं. माझी आई एसपी महाविद्यालयातील पोस्ट कार्यालयात पोस्टल असिस्टंट आहे. तर वडील मूळशी तालुक्यातील मंडल कृषी अधिकारी आहेत. त्यामुळे अभ्यासावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता आले.
यूपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना काय सल्ला देशील?
लोकसेवा करण्याची ही एक चांगली संधी आहे. लाल दिवा, पैसा या गोष्टींच्या पलीकडे जात सामाजिक जाणीव असणे महत्त्वाचे आहे. समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना जाणून घेण्याची तळमळ असली तरच प्रशासकीय सेवेच्या नोकरीला न्याय देता येईल.