वसई तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केलेले आहे. त्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असताना या परिसरात टॅंकर माफियांची दादागिरी वाढलेली आहे.
नालासोपारा- वसई तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केलेले आहे. त्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असताना या परिसरात टॅंकर माफियांची दादागिरी वाढलेली आहे. शहरातील अनेक भागात टॅंकरने पाणी पुरवण्याचा धंदा तेजीत असून गळक्या टॅंकरने रस्त्यावर पाणी सांडत आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असताना हे टॅंकर माफिया सर्व नियम धाब्यावर बसवून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहतूक करत आहेत.
वाढत्या उष्म्याने बोरिंग आणि विहिरी आटत चालल्या आहेत. महानगरपालिकेचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने टॅकर लॉबी याचा पुरेपूर फायदा उचलत आहे. वसई तालुक्यात अनेक ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. सूर्याची जलवाहिनी वारंवार फुटत असते. या संधीचा गैरफायदा टँकर लॉबी घेत आहे. एरवी १हजार रुपयांत टॅंकरचे पाणी उपलब्ध होते. पण महानगरपालिकेचा पाणी पाणीपुरवठा खंडित झाला की, हे टॅंकरलॉबी एका टॅंकरमागे ३ हजार रुपये उकळतात.
पैशाच्या हव्यासापोटी हे टॅंकर गळत असतानाही पाणी पुरवठा करण्यात येतो. दिवसरात्र अशा गळक्या टॅंकरची वाहतूक शहरात सुरू आहे. या टॅंकरमधून पाणी सांडून रस्त्यावर चिखल होतो. या चिखलात वाहने घसरून छोटे मोठे अपघात रोजच होत असतात. शिवाय पाणी सांडल्यामुळे पाणीही वाया जाते. तसेच हे टॅकर कुठूनही यू टर्न घेत असल्यामुळे इतर वाहनचालकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे रस्त्यात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या टॅंकरचालकांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी नागरिकांची मागणी आहे. तसे झाल्यास गळके टॅंकर रस्त्यावर येणार नाहीत. दरम्यान, या संदर्भात वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
आम्ही कारवाई करतो
आम्ही एखादा गळका टॅंकर निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करत असतो. अशा टॅंकरवर कारवाई करण्याची जबाबदारी केवळ आमचीच नसून पोलीसही कारवाई करू शकतात. – अभय देशपांडे, आरटीओ अधिकारी