महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नालासोपारा हे ‘बुद्धिस्ट सर्किट टुरिझम सेंटर’ बनवण्याचा निर्णय घेतल्याने नालासोपारा शहर जगाच्या नकाशावर येणार आहे.
विरार – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नालासोपारा हे ‘बुद्धिस्ट सर्किट टुरिझम सेंटर’ बनवण्याचा निर्णय घेतल्याने नालासोपारा शहर जगाच्या नकाशावर येणार आहे. त्याअनुषंगाने महामंडळाने ‘बुद्धिस्ट प्रदक्षिणे’चा प्रारंभ नालासोपारा येथून करण्याचा निर्णय घेतला आहे. सम्राट अशोक यांचे पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत जाण्याचा प्रारंभ नालासोपारा येथून केला होता. त्यामुळेच नालासोपा-याची निवड केल्याची माहिती ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी दिली.
नालासोपारा शहराला २६०० वर्षाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. प्राचीन काळी भारतातून मेसोपोटेमिया, अरेबिया, ग्रीस, रोम, आफ्रिका या देशांत व्यापार चाले. त्या काळी नालासोपारा हे बंदरांचे प्रमुख ठिकाण होते. नालासोपारा पूर्वी ‘सुनपरांता’ म्हणून ओळखले जात होते. त्या वेळी सुनपरांता येथील श्रीमंत व्यापारी आणि व्यावसायिक पूर्णा मैत्रयानीपुत्र याने उत्तर प्रदेशातील श्रावस्तीच्या भेटीवेळी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.
भगवान गौतम बुद्धांची वचने ऐकल्यानंतर त्याने आपल्या संपत्तीचा त्याग करून बौद्ध भिक्षू होण्याचा निर्णय घेतला होता. पूर्णा मैत्रयानीपुत्र याने भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार करण्याचे ठरवले आणि तो नालासोपारा येथे आला. आपल्या भक्तांच्या मदतीने त्याने बुद्धविहार उभारण्यास सुरुवात केली. त्याला चंदनाचे आठ दरवाजे बसवले, असे इतिहासात नमूद आहे. पूर्णा याने या बुद्धविहाराचे उद्घाटन करण्यासाठी भगवान गौतम बुद्धाना निमंत्रण दिले होते. त्या वेळी भगवान गौतम बुद्ध त्यांच्या ५०० सहका-यांसह आठवडाभरासाठी नालासोपारा येथे आले होते. भगवान गौतम बुद्धांची स्मृती कायम राहावी म्हणून पूर्णा याने भगवान गौतम बुद्धांकडून त्यांचे भिक्षापात्र मागून घेतले.
९ एप्रिल १८८२ रोजी पंडित भगवानलाल इंद्रजीत यांना या भिक्षापात्राचा शोध लागला होता. ब-याच काळानंतर सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्या वेळी त्यांनी नालासोपारा येथे बुद्धविहाराची उभारणी केली. सम्राट अशोक यांनी त्यांचे पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेस पाठवले, असे सांगितले जाते. सम्राट अशोक यांनी एकूण १४ शब्दशिल्पे कोरली आहेत. त्यापैकी ८ शब्दशिल्पे पंडित भगवानलाल इंद्रजीत यांना माहेता जलाशयाजवळ सापडली आहेत. ९वे शिल्प एशियाटिक सोसायटीचे ग्रंथपाल एन. ए. गोरे यांना १९५६ मध्ये भुईगाव येथे मिळाले. ठाणे जिल्हाधिका-यांच्या मदतीने गोरे यांनी ही लेणी शोधून काढली होती.
दरम्यान, वसई-विरार शहर महापालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, सर्वोतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. सर्व ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याने परवानगी दिल्यास पालिका त्यासाठी सक्षम आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष अजीव पाटील यांनी दिली. नालासोपारा पर्यटनाच्या नकाशावर आल्यास धार्मिक पर्यटनास अपोआप चालना मिळेल. ही प्रदक्षिणा नागपूर येथील दीक्षाभूमीवर समाप्त होईल. तत्पूर्वी दादर येथील चैत्यभूमी, गोराई येथील पॅगोडा आणि बौद्ध धर्मियांच्या इतर ठिकाणी भेटी देण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनी दिली.