वसई तालुक्यात मोठया प्रमाणात होत असलेल्या प्रवासी वाहतुकीमुळे अधिकृत परवानाधारक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
विरार- वसई तालुक्यात १३ हजार रिक्षांना परवाने देण्यात आले असून, हे परवानाधारक कोटयवधींचा महसूल सरकारला देत आहेत. मात्र वसई तालुक्यात मोठया प्रमाणात खासगी टाटा मॅजिकमधून होत असलेल्या प्रवासी वाहतुकीमुळे या अधिकृत परवानाधारक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ही अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याची मागणी ऑटो रिक्षा टॅक्सीचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मधुसूदन राणे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही वाहतूक बंद न झाल्यास येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही राणे यांनी दिला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेला परिवहन सेवेमार्फत टप्पा प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे. सध्या तालुक्यातील नागरिकांना रिक्षा व परिवहन सेवेमार्फत योग्य सेवा मिळत आहे. मात्र वाहतूक शाखेच्या डोळयादेखत अवैध तथा कोणताही परवाना नसलेल्या टाटा मॅजिकमधून बिनदिक्कत टप्पा प्रवासी वाहतूक होत आहे. विशेषत: नालासोपारा, विरार या ठिकाणी मोठया प्रमाणात खासगी वापरासाठी पासिंग झालेल्या टाटा मॅजिकचा वापर टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी होत आहे. त्यामुळे इमानेइतबारे सरकारला टॅक्स भरणा-या व परवानाधारक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, नालासोपारा ब्रीजखाली चालणा-या टाटा मॅजिकमुळे पालिकेच्या परिवहन सेवेचे दर दिवसाला १२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे पालिकेसोबतच वाहतूक विभागाने याविरोधात कडक भूमिका घेण्याची गरजही मधुसूदन राणे यांनी व्यक्त केली आहे.