वसई-विरार महापालिकेची दडपशाही आणि सत्ताधा-यांच्या दंडेलीचा अनुभव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा आला.
विरार – वसई-विरार महापालिकेची दडपशाही आणि सत्ताधा-यांच्या दंडेलीचा अनुभव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा आला. या सभेत नालासोपारा-निळेगावातील रस्त्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित करताच, महापौरांनी कोणताही खुलासा न करता, विषयपत्रिकेनुसार सभा सुरू राहील, असे सांगून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र याविरोधात जनआंदोलन पक्षाचे नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी जमिनीवर बसून निषेध नोंदवला.
नालासोपारा स्टेशनपासून निळेगावपर्यंतचा रस्ता गेल्या २५ वर्षापासून रखडला आहे. येथील सत्ताधारी पक्षाला केंद्र व राज्य सरकारचा पाठिंबा आहे. असे असतानाही निळेगाव रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. निळेगावात जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. निळेगावातील रस्त्यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती वसई-विरार महापालिका प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र गेल्या चार वर्षात केंद्राकडून त्यांच्या खासदारांनी रेल्वेची परवानगी का आणली नाही, याचे मात्र कोडे सुटत नाही, अशी शंका चोरघे यांनी व्यक्त केली आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील रेल्वेच्या पूर्व भागातील रस्त्याचा प्रश्न असाच प्रलंबित होता. त्या वेळचे खासदार राम कापसे यांनी १९८५ला रेल्वे प्रशासनाविरोधात उभे राहून ठाणे महापालिकेचा रस्ता बनवायला सांगितला होता. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत ते तिथे थांबले होते. मात्र आपले खासदार असे का करत नाहीत? एकीकडे खासदार सांगतात, दिल्लीतून अमुक एक काम मंजूर करून आणले आहे. मग गेली २५ वर्षे निळेगावातील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित का, असा प्रश्नही चोरघे यांनी उपस्थित केला.