वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे प्रचंड बहुमताने विजयी होतील.
मुंबई- वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे प्रचंड बहुमताने विजयी होतील. पंचवीस वर्षाचा संसदीय कामकाजाचा अनुभव, आक्रमक नेतृत्व, लोकांचे प्रश्न मांडण्याची तळमळ असल्याने लोकांचे प्रश्न ते हिरिरीने सभागृहात मांडतील. राणे यांच्या रूपाने काँग्रेसचा आवाज विधासभेत गर्जत राहील, असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.
भाजपावाले फक्त उद्घाटन करतात- मोहन प्रकाश
केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपाचे सरकार आल्यापासून गरिबांच्या बाजूचे कायदे बदलण्याचा धडाका लावला आहे. काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा दिला. मात्र हे सरकार आल्यापासून रेशनच्या दुकानावरील धान्य बंद झाले आहे. जमीन अधिग्रहण कायद्याने शेतकरी उद्ध्वस्त केला जात आहे.
चर्चवर हल्ले होऊ लागले आहेत. घर वापसीसारखे उपक्रम राबवून समाजासमाजात वाद निर्माण केले जात आहेत. हे रोखायचे असेल आणि गरिबांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर नारायण राणे यांच्यासारख्या धडाडीच्या नेत्याला विधानसभेत पाठवा, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी केले.
राणे यांच्या विजयाने काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकेल – प्रिया दत्त
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचा राहिला आहे. काही चुकांमुळे आपल्या हातून विजय निसटला आहे. मात्र आता आपणाला पुन्हा येथे काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना जिंकून देऊन विधानसभेत पाठवायचे आहे. त्यासाठी तुमचे खूप मोठे सहकार्य अपेक्षित आहे, असे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या वेळी म्हणाल्या.
राणे यांचा विजय काँग्रेसला बळ देईल – सुशीलकुमार शिंदे
राज्यात नेहमी काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला धक्का लागला. आता नारायण राणे यांच्या विजयाने संपूर्ण देशात काँग्रेस सहयोगी सदस्यांना एक प्रकारचा संदेश जाणार आहे. बळ मिळणार आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले.
नारायण राणे यांचा विजय म्हणजे काँग्रेसचा विजय असणार आहे. हा विजय काँग्रेसला चैतन्य आणि बळ देणारा आहे. या विजयाचा संदेश काँग्रेसबरोबर असणा-या सर्व सहयोगी सदस्यांना आत्मविश्वास देणारा ठरणार आहे. म्हणून नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी तुम्हाला अहोरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
राणे यांची उमेदवारी काँग्रेसला चैतन्य देणारी – प्रा. जनार्दन चांदूरकर
काही लोक जनतेतील एकता तोडण्याचे काम करीत आहेत. अशा जातीयवादी संघटनांना रोखायचे असेल तर काँग्रेसला साथ द्यावी लागेल. नारायण राणे यांची उमेदवारी काँग्रेसला चैतन्य देणारी आहे, असे मत खेरवाडीचे माजी आमदार प्रा. जर्नादन चांदूरकर यांनी व्यक्त केले.
राणे यांना राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा- सचिनभाऊ अहिर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टीत राहणा-या लोकांसाठी नेहमीच कामे करीत राहिली आहे. २००० पर्यंतच्या झोपडय़ांचा ऐतिहासिक निर्णय, १९९५पर्यंतच्या झोपडय़ांचे निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने घेतले आहेत.
नारायण राणे या सर्व घटनांचे साक्षीदार आहेत. ते अभ्यासू आणि आक्रमक नेते आहेत. अशा नेत्याची नितांत गरज आहे. तेव्हा नारायण राणे यांना बहुमतांनी विजयी करा. राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा राणे साहेबांना आहे, असे मत त्यांनी येथे व्यक्त केले.
आंबेडकरी जनता राणे यांनाच साथ देईल- डॉ. राजेंद्र गवई
खुर्चीसाठी समाजात तेढ निर्माण करणा-या काही शक्ती आहेत. तेव्हा योग्य निर्णय घ्या. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून त्यांनी आपली दिशाभूल केली आहे. त्यामुळे विचार करा. नारायण राणेंसारखा खमका नेता नाही.
झोपडपट्टीवासीयांचे अश्रू पुसू शकतो. ही मोठी संधी आहे. भाजपा सरकार सामाजिक न्याय विभागाचा निधी बाबासाहेबांच्या वास्तू विकत घेण्यासाठी खर्च करत होती. अशा सरकारला धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी नारायण राणे यांना निवडून द्या. त्यांना विधानसभेत पाठवा. दलित आंबेडकरी जनतेचा नारायण राणे यांना पाठिंबा आहे.
राणे मोठया मनाचे – शिवराजसिंग वाल्मीकी
नारायण राणे हे केवळ कोकणातीलच नेते नाहीत. मी दलित समाजाचा साधा कार्यकर्ता होतो. माझ्या मुलीच्या लग्नाला राणे साहेबांनी यावे अशी मी इच्छा व्यक्त केली होती. साहेबांनी ती ऐकली आणि माझ्या गावी दलित वस्तीत ते आले. साहेब मोठया मनाचे आहेत.
नेता असावा तर नारायण राणे साहेबासारखा, असे अ.भा.काँ.स. सचिव शिवराजसिंग वाल्मीकी म्हणाले.