दुष्काळाने हवालदिल झालेल्या राज्यातील शेतक-यांच्या व्यथा जाणून त्यांना दिलासा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ५ ते ७ मे दरम्यान दुष्काळी दौ-यावर जाणार असल्याचे काँग्रेसतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले.
मुंबई- दुष्काळाने हवालदिल झालेल्या राज्यातील शेतक-यांच्या व्यथा जाणून त्यांना दिलासा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ५ ते ७ मे दरम्यान दुष्काळी दौ-यावर जाणार असल्याचे काँग्रेसतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीवर तातडीच्या उपाययोजना करण्यात राज्यातील फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ सरकारवर आली आहे. त्यातही पक्षाचे बॅनर्स रेल्वेवर झळकावून गलिच्छ राजकारण करण्यात आल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.
शुक्रवारी काँग्रेस गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले, ‘दुष्काळग्रस्त भागात शेतक-यांना आधार देणा-या रोजगार हमी योजनेची लाखो कामे फडणवीस सरकारने अद्याप मंजूर केलेली नाहीत. हाताला काम नसल्याने लोक बेरोजगार झाले आहेत. तर वर्षभरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची संख्याही वाढली आहे. यात सरकारी टँकरपेक्षा खासगी टँकरची संख्या अधिक आहे. टँकरमाफियांची मोठी लॉबीच सरकारकडून पोसली जात आहे.
टँकरच्या फे-या केवळ कागदावर दाखवल्या जात असून, अनेक ठिकाणी टँकरच्या बोगस नोंदी सापडल्याचा आरोप करत पाण्याच्या टँकर्सवर जीपीएस यंत्रणा जोडण्याची मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. काही राजकीय पक्ष दुष्काळी भागात सामूहिक विवाह सोहळे आयोजित करत आहेत. ते जरी चांगले असले तरी सरकारने अशा उपक्रमात आपला प्रत्यक्ष सहभाग दाखवायला हवा होता, असा टोलाही चव्हाण यांनी यावेळी लगावला.
मंत्री हेलिकॉप्टरने फिरण्यात व सेल्फी काढण्यात गुंग
२०१५ मध्ये आत्महत्याग्रस्त शेतक-यांची संख्या ३ हजार २२४ होती. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. १५ जुलै २०१६पर्यंत पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. पुरेशा चारा छावण्या नसल्याने जनावरांना चारा छावण्या नाहीत. सरकार पाठीशी उभे राहत नसल्याने अधिकारी ठोस निर्णय घेण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत काही मंत्री हेलिकॉप्टरने फिरत आहेत. तर काही सेल्फी काढण्यात गुंग आहेत. त्याऐवजी मंत्र्यांनी लोकांशी संवाद वाढवल्यास त्यांना चार-दोन चांगली कामे करता येतील, असा टोलाही चव्हाण यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांना लगावला.