सौराष्ट्रात जशी द्वारका तसे हे राजस्थानातले नाथद्वारा आहे. इथला श्रीनाथ हा गोकुळातला दही, दूध, लोणी खाणारा बाळकृष्ण आहे. इथले लोक या देवस्थानाला मंदिर न म्हणता, ‘नंदजीका घर’ म्हणतात. त्यामुळे देवस्थानाला शिखर नाही. वर एक छप्पर असून त्यावर वैष्णव ध्वज फडकत असतो.
राजस्थानातील राजसंमद तालुक्यात बनास नदीच्या काठी वसलेले ‘नाथद्वारा’ हे तीर्थक्षेत्र उदयपूरपासून ४८ कि. मीटर अंतरावर आहे. याच्या पूर्वेला आरवली पर्वत व पश्चिमेला बनास नदी आहे. या गावातील गोवर्धन गिरीधारी हे श्रीकृष्ण मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. वैष्णव धर्माच्या वल्लभ संप्रदायाचे हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस वल्लभाचार्य नावाचे महापंडित आणि महान कृष्णभक्त होऊन गेले. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात एका तेलगू ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे आणि एकपाठी होते.
वयाच्या पाचव्या वर्षी ते गावातल्या पाठशाळेत जाऊ लागले. आणि विष्णुचित्त नावाच्या गुरुजींच्या देखरेखीखाली प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काशीला जाऊन अनेक शास्त्रांचा अभ्यास केला. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र तत्त्वज्ञान निर्माण करून त्याला पुष्टीमार्ग असे नाव दिले.
नंतर आपल्या पुष्टीमार्गाच्या प्रचारासाठी भारतभर भ्रमण केले. आणि अनेक मोठमोठय़ा पंडितांना शास्त्रार्थात पराभव केला. फिरत असताना झारखंड प्रदेशात एके दिवशी स्वप्नदृष्टांत होऊन श्रीकृष्णांनी सांगितले की, आता तुझी यात्रा थांबव आणि वृंदावनात जा. तिथे गोवर्धन पर्वतावर तुला माझी एक मूर्ती सापडेल. तू तिची तिथे प्रतिष्ठापना करून उपासना कर.
असा दृष्टांत झाल्यावर वल्लभाचार्य वृंदावनात गेले आणि मूर्तीचा शोध घेऊ लागले. शोधता शोधता एके ठिकाणी त्यांना श्रीकृष्णाची म्हणजे श्रीनाथाची मूर्ती सापडली. ती दिसल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. त्याच्याकडे टक लावून पाहता पाहता त्यांचे अष्टसात्त्विक भाव जागृत झाले. पांडित्य नाहीसे होऊन एक महान कृष्णभक्त निर्माण झाले.
नंतर वल्लभाचार्यानी त्या गोवर्धन पर्वतावर श्रीनाथाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिची अष्टयात्रा म्हणजे आठही प्रहरांची सेवा सुरू केली. अंबाल्याचे एक श्रेष्ठी पुरणमल खत्री यांनी एक सुंदर मंदिर बांधले आणि हा श्रीनाथ थोडय़ाच काळात असंख्य भाविकांचा उपास्य दैवत झाला.
राजस्थानमधल्या उदयपूरचा राजा राजसिंह श्रीनाथाचा परमभक्त होता. त्याला एका रात्री श्रीनाथाने दृष्टांत दिला. राजा! मला या गोवर्धन पर्वतावर राहणे नकोसे झाले आहे. तू मला तुझ्या राज्यात घेऊन जा. दृष्टांत झाल्यावर राजसिंह ताबडतोब गोवर्धन पर्वतावर गेला.
त्याने मंदिरातील मूर्ती उचलून रथात ठेवली आणि श्रीनाथाची रथयात्रा राजस्थानच्या दिशेने सुरू झाली. रथाच्या मागोमाग श्रीनाथाचे भक्तही भजन करत निघाले. त्यात कृष्णभक्त गोस्वामी देवही होते. राजसिंह मूर्तीला उदयपूरला नेणार होता. तिथे त्यांचे मंदिर बांधणार होता. आणि वल्लभाचार्याप्रमाणे श्रीनाथाची अष्टयात्रा सेवा सुरू करणार होता.
रथयात्रा उदयपूरच्या अलीकडे सिंहद गावात पोचली. तिथे चाके जमिनीत रुतून बसली. राजाने ती वर काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण चाके वर निघाली नाहीत. रात्री राजाला दृष्टांत झाला. ‘मला हे सिंहद गाव आवडले आहे. मी इथेच राहणार आहे. मला पुढे नेण्याचा प्रयत्न करू नकोस. राजसिंहाला हा दृष्टांत मानावाच लागला. त्याने तिथेच श्रीनाथाची स्थापना केली आणि त्या गावाचे उत्पन्न देवाच्या सेवेला लावून दिले.’
कृष्णभक्त गोस्वामींनी १६७२ मध्ये प्रथम हे मंदिर बांधले आणि तिथेच मूर्तीची स्थापना केली. आणि तीच जागा पुढे नाथद्वारा म्हणून प्रसिद्धीला आली. वेळोवेळच्या राज्यकर्त्यांनी या मंदिराची पुनर्रचना केली आहे. मंदिरातील मूर्ती बाराव्या शतकातील असून वज्रभूमी वृंदावन इथल्या मंदिरातील आहे. मूर्ती अखंड काळय़ा दगडात कोरलेली आहे. मूर्ती बाल्यावस्थेतील असून हाताची करंगळी वर उचललेल्या गिरीधारीच्या रूपात आहे.
या मंदिराला राजमहालासारखी रचना असल्यामुळे हवेली म्हणतात. हे वल्लभाचार्याच्या संप्रदायाचे स्थान आहे. सौराष्ट्रात जशी द्वारका तसे हे राजस्थानातले नाथद्वारा आहे. इथला श्रीनाथ हा गोकुळातला दही, दूध, लोणी खाणारा बाळकृष्ण आहे. इथले लोक या देवस्थानाला मंदिर न म्हणता ‘नंदजीका घर’ म्हणतात. त्यामुळे देवस्थानाला शिखर नाही. वर एक छप्पर असून त्यावर वैष्णव ध्वज फडकत असतो. हे देवस्थान फार श्रीमंत आहे.
या मंदिरात भाविकांना मंगल, शृंगार, ग्वाल, राजभोग, उथापन, भोग, आरती, आणि शयन असे आठ प्रकारचे दर्शन मिळते. नंद महोत्सव, गोपाळकाला, जन्माष्टमी हे उत्सव साजरे होतात. नाथद्वाराचं गिरीधराचं मंदिर पिचबाई पेंटिंग, चांदीची कलाकुसर व हवेली संगीतासाठी प्रसिद्ध आहे.