९५व्या नाटय संमेलनाला मोजून १५ ते २० कलावंतांनीच हजेरी लावली असून, बहुसंख्य कलावंतांनी पाठ फिरवली.
बेळगाव – ९५व्या नाटय संमेलनाला मोजून १५ ते २० कलावंतांनीच हजेरी लावली असून, बहुसंख्य कलावंतांनी पाठ फिरवली. या संमेलनाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही दांडी मारल्याने बेळगावकर नाटय़रसिकांचा हिरमोड झाला.
उदघाटन सोहळा सुरू होताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नासंबधीच्या घोषणा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस संमेलनात आले, त्यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
संमेलनाच्या मुख्य मंडपातील स्मिता तळवलकर रंगमंचावर सकाळी ११ वाजता शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि शिवाजी महाराज तसेच नटराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून या सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर मनोगत व्यक्त करत असतानाच मंडपात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली.
या घोषणाकर्त्यांसमवेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर, बेळगावचे महापौर महेश नाईक आणि उपमहापौर रेणू मुतकेकर हे होते, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘नाही कुणाच्या बापाचे, बेळगाव आमच्या हक्काचे’, ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘वीणा लोकूर मुर्दाबाद, किरण ठाकूर झिंदाबाद’ या घोषणांनी त्यांनी मंडप दणाणून सोडल्याने काही काळ संमेलनात गोंधळ निर्माण झाला.
कर्नाटकचे पोलिसही मंडपात धावून आले. हा गोंधळ पाहून नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर रंगमंचावरून खाली उतरून मंडपात आले आणि त्यांनी किरण ठाकूर, आणि मुतकेवार यांना रंगमंचावर नेले. त्यानंतर हा गोंधळ थांबला. या दरम्यान स्वागताध्यक्ष अशोक साठे यांचे भाषण झाले. त्यानंतर शरद पवार यांच्या सत्कार व सीमाप्रश्नाशी संबंधीत घोषणा प्रेक्षकांतून उमटत राहिल्या. नंतर घोषणाबाजी थांबल्याने उद्घाटन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
नाटयसंमेलनाला १५ ते २० कलाकारांची उपस्थिती
नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने मुंबई-पुण्याबाहेरच्या लोकांना मराठी नाटय़ कलाकारांना जवळून पाहता यावे, हा नाटय़ संमेलनामागचा एक हेतू असल्याचे नाटय़ परिषदेतर्फे सांगितले जाते. तरी कलाकार मंडळी ही गोष्ट मनावर कशी घेत नाहीत, याचा प्रत्यय बेळगाव संमेलनात येतो आहे.
या संमेलनाकडे नामवंत नाटय़ कलाकारांनी सपशेल पाठ फिरवल्याने बेळगावमधील नाटय़प्रेमींची त्यांना पाहण्याची अपेक्षा फोल ठरली आहे.
बेळगाव नाटय़संमेलनाच्या पहिल्या दिवशी अगदीच थोडे नामवंत कलाकार दिसले. एकेकाळी नाटय़ संमेलनाच्या दिंडीतील कलाकार हे मोठे आकर्षण असे, परंतु बेळगावमधील दिंडीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कलाकार सहभागी झाले होते.
कलाकारांनी नाटय़संमेलनाला उपस्थित राहावे, असा ठरावही दोन वर्षापूर्वी नाटय़ परिषदेने मांडला होता, परंतु कलाकार त्याला जुमानत नसल्याचे संमेलनात दरवेळी दिसून येते. संमेलनाला येण्याऐवजी ते नाटकाचे प्रयोग आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असतात. बेळगाव संमेलनातही हेच चित्र दिसून आले, बेळगाव संमेलनाच्या तारखा बदलल्याने कलाकार न आल्याचे परिषदेकडून सांगितले जात असले तरी मुळातच कलाकार संमेलनात येण्यास अनुत्सुक असतात, असे अनेकदा लक्षात आले आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, ‘प्रहार’ला मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावला विमानाने आणण्याची सोय न केल्याने एक तरुण आणि एक अनुभवी अभिनेत्री-निर्मातीने संमेलनाला येण्यास नकार दिला.
मराठी नाटक महाराष्ट्राची अस्मिता : मुख्यमंत्री
सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभाला दांडी मारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी संमेलनाला भेट दिली. नाटय़रसिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, मराठी नाटक हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित आहे. ते मागे पडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. त्यासाठी जे जे लागेल ते ते आम्ही देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
संमेलनाध्यक्ष अभिनेत्री फय्याज यांनी छापील भाषणाव्यतिरिक्त अर्धा तास उत्स्फूर्त भाषण केले. त्यांनी बाल रंगभूमी, हौशी व कामगार रंगभूमी, प्रायोगिक व समांतर रंगभूमी, लोककला रंगभूमी, संगीत रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी या रंगभूमीच्या सगळ्या शाखांचा आढावा घेतला. ‘बेळगावशी आपला जुना ऋणानुबंध असून माझ्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत मी २०० वेळा बेळगावला आले आहे. इथल्या लोकांनी माझ्यावर, माझ्या गाण्यावर खूप प्रेम केले आहे. आज याच शहरात मी नाटय़संमेलनाची अध्यक्ष म्हणून येत आहे, याचा मला खूप आनंद होतोय,’ या शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
सेलिब्रिटींना सध्या ओव्हर एक्स्पोजर मिळत आहे. एकच कलाकार चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटक असा सगळीकडे दिसत आहे. तसे होऊ देऊ नये, या शब्दांत त्यांनी सेलिब्रिटींना चिमटा काढतानाच आजकाल अनेक संस्था इव्हेंट करतात. त्यांनी यावर खर्च होणारी तीस-चाळीस टक्के रक्कम नाटय़विषयक कार्यशाळांसाठी द्यावी. या कार्यशाळांतून संहिता कशा लिहाव्यात, नाटक कसे बांधावे हे तरुण रंगकर्मीना शिकता येईल. त्यामुळे त्यातून नवे लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार वगैरे मिळू शकतील, असेही त्या म्हणाल्या.
मोजक्याच कलावंतांची हजेरी
पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, अदिती सारंगधर, अर्चना नेवरेकर, रमेश भाटकर, प्रदीप कबरे, मेघा भागवत, पंढरीनाथ कांबळे, संजय क्षेमकल्याणी, अशोक समेळ, संतोष पवार, सुशांत शेलार, विद्या करंजीकर, स्मिता जयकर, अशोक हांडे, विजय कदम, गिरीश जोशी, कांचन अधिकारी हे कलाकार उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
सीमाप्रश्नाचा ठराव होणार का?
पोलिसांनी घातलेल्या जाचक अटी आणि बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचा सीमाप्रश्नावर ठराव करण्याचा आग्रह अशा दुहेरी कोंडीतून नाटय़ परिषद काय मार्ग काढणार, यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रविवारी सकाळी नियामक मंडळाची बैठक होणार असून, त्यात ‘सीमाप्रश्ना’चा ठराव मांडणार की नाही याबाबत निर्णय होईल. ठराव करण्याचे ठरले तर सायंकाळी खुल्या सत्रात तो मांडला जाईल.
नाटय़व्यवसायाचा उद्योग म्हणून विचार व्हावा
या सोहळ्याचे उद्घाटक व ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार म्हणाले, व्यावसायिक रंगभूमी गंभीर प्रश्नांना तोंड देत आहे. दोन-चार नाटकांना व्यावसायिक यश मिळाले म्हणजे एकूणच व्यवसाय उत्तम चालला आहे, असे समजणे स्वत:ला फसवण्यासारखे आहे. या व्यवसायाला उद्योगाचं स्वरूप देण्याचा विचार द्यायला हवा. त्यासाठी अर्थकारणाची नवी मॉडेल्स तयार व्हायला हवीत. प्रायोगिक विचारसरणीचे कलाकार अनोखे विषय आणि आव्हाने पेलतात, त्यामुळे या रंगभूमीस सवलती आणि अनुदाने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नाटय़ परिषदेसारख्या मातृसंस्थेने पावले उचलावीत, असाही सल्ला त्यांनी दिला.