नागोठणे शहर व परिसरातील कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्याने सर्वत्र कच-यांचे साम्राज्य पसरले आहे
नागोठणे – नागोठणे शहर व परिसरातील कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्याने सर्वत्र कच-यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवर कच-यांचे ढीग साचले असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता कच-यांची विल्हेवाट लावण्यास असलेली यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यातच शहरात सुरू असलेली नवी बांधकामे पाहता वाढीव लोकसंख्येसाठी कच-यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन आधुनिक यंत्रणेची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठया प्रमाणात होत असलेल्या बांधकामांमुळे नागरी सोयी-सुविधांवर ताण पडत आहे. तसेच पाणीपुरवठा, वीज, कच-यांची विल्हेवाट आदी समस्या उद्भवू लागल्या आहेत.
नालेसफाईला मुहूर्त नाहीच
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागोठणे ग्रामपंचायतीकडून शहरातील गटारे आणि नाले साफ करण्यात येतात. पावसाळा पंधरा दिवसांवर आला असताना ही अद्याप ग्रामपंचायतीकडून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील जोगेश्वरीनगर ते विशाल मेडिकल, मच्छीमार्केट, गुरव आळी येथे मोठे नाले आहेत. या नाल्यातील कचरा वेळेत न काढल्यास पावसाळयात नाल्यांतील पाणी परिसरात साचते. त्यामुळे पावसाळयापूर्वी या नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.