गुन्हेगारीने धास्तावलेले नागपुरातील शांतताप्रेमी नागरिक आता सरकारला प्रश्न विचारू लागले आहेत की, पावसाळी अधिवेशनानंतर तरी नागपुरातील गुन्हेगारी कमी होणार का?
नागपूर- महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कधी नव्हे ते नागपुरात होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच सरकार नागपुरात दाखल झाले आहे. बुधवारपासून प्रत्यक्ष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तयारीची माहिती घेण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांतील वृत्तपत्रे चाळली असता त्यातील ठळक बातम्या पाहून धक्का बसला. कुख्यात गुंड विनू पांडेवर गोळीबार, डोळय़ांत मिरची पूड टाकून पन्नास लाख लुटले, दोन दिवसांत तीन हत्या, एकाच घरातील पाचजणांच्या हत्या, अल्पवयीन मुलीवर बलात्कार. या सर्व बातम्या पाहिल्यानंतर नागपुरातील गुन्हेगारीचे स्वरूप किती विदारक आहे, याची प्रचिती येते. गुन्हेगारीने धास्तावलेले नागपुरातील शांतताप्रेमी नागरिक आता सरकारला प्रश्न विचारू लागले आहेत की, पावसाळी अधिवेशनानंतर तरी नागपुरातील गुन्हेगारी कमी होणार का?
नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख गेल्या काही दिवसांपासून झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. अत्यंत निर्घृण हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक उरलेला नाही. दंगल, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यात मुन्ना यादव सारखा आरोपी पोलिसांना हवा असतो, त्याला अटक व्हावी अशी मागणी विरोधक सभागृहात करतात तरी त्याला पोलीस अटक करू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर जो मुन्ना यादव बिनधास्त नागपुरात फिरतो त्याला पोलीस अटक करीत नाहीत, पण प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल होते, तेव्हा त्याच्यावरील ३०७ म्हणजे हत्येचा प्रयत्न करणे हे कलम काढून टाकून, मारहाण केल्याचे आणि सहज जामिन मिळू शकेल असे ३२६ कलम लावले जाते. जे पोलीस पहिल्यांदा ३०७ कलम लावतात तेच पोलीस ते कलम हटवितात, हे सहज घडणारे आहे, याच्यावर कोणत्याही सामान्य माणसांचा विश्वास बसणार नाही. नागपुरात राजकीय गुन्हेगारी झपाटय़ाने वाढत आहेत. दीड वर्षापूर्वी भाजपाचे आमदार कृष्ण खोपडे आणि त्याच्या मुलांनी एका हॉटेलमध्ये केलेल्या तोडफोडीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तेव्हा त्या प्रकरणात खोपडे आणि त्यांच्या दोन मुलांना अटक झाली होती. तर शिवसेना नेता म्हणून मिरवणा-या तंजू तोलवानी याच्या मुलाने तर पोलिसांवरच हल्ला केला होता. असा गुन्हेगारीला राजाo्रय मिळत असल्यामुळे नागपुरातील गुन्हेगारी वाढत असल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे.
नागपूरातील गुन्हेगारीचे स्वरूप किती गंभीर आहे. नागपुरात गुंडांच्या सुमारे पंचवीस टोळय़ा कार्यरत असून ते एकमेकांच्या टोळय़ांवर हल्ले करीत असतात. गेल्याच आठवडय़ात विनू पांडे नावाच्या गुंडावर गोळीबार झाला. नागपुरात पिस्तूल आणि गावठीकट्टे अत्यंत सहज उपलब्ध होत आहेत. म्हणून नागपूर म्हणण्या ऐवजी आता पिस्तूलपूर म्हणून ओळखले जाईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तीनच दिवस अगोदर दोन दिवसांत तीन हत्या झाल्या. कोराडी, गणेशपेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळय़ा कारणांसाठी या हत्या झाल्या. तर ३० जून रोजी शिवम टॉवर येथे एका कॅशियरच्या डोळय़ात मिरचीची पूड टाकून ५० लाखांचा ऐवज गुंडांनी लंपास केला. एका अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण याच आठवडय़ात उघडकीस आले असून एका प्रियकराने तर भरचौकात आपल्या प्रेयसीला मारहाण केली. डीसीपीच्या सहीचे लेटर हेड घेऊन फसवणूक करण्याचे प्रकरणही समोर आले आहे.
नागपूर शहराची ही अवस्था गेल्या तीन वर्षांपासून अशीच आहे. २०१६ च्या महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वार्षिक अहवालातच नागपूरात गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे पुरावे मिळतात. अहवालात राज्यातील नऊ बडय़ा शहरांतील गुन्हेगारी दराचा आलेख देण्यात आला आहे. त्यात नागपूर शहरात सर्वाधिक दर लाख लोकसंख्येमागे ३८७ गुन्हे होत असल्याचे नमूद केले आहे. मुंबई शहराच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल ८७ ने अधिक आहेत. राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपुरातील गुन्हेगारी अचानक वाढल्याचे अहवालात दिसून येते. सन २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर राजधानी मुंबई पाचव्या स्थानावरून अचानक तिस-या स्थानी आली. तेथील गुन्हेगारी दर २४२ वरून २७७ इतका झाला, तर नागपूर दुस-या स्थानावरून पहिल्या स्थानी आले. येथील दर ३३९ वरून वाढून ३५८ इतका झाला.
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणून ओळखले जाते. नेहमी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले जाते. यावेळी मात्र पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले जात आहे. अधिवेशनासाठी स्थानिक शहर आणि ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाला आहेच. त्याशिवाय राज्यभरातून राखीव पोलीस दल, एसआरपी, काही जिलचे राखीव पोलीस बंदोबस्तासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. अधिवेशन तोंडावर असेल तर पोलीस दलाने अधिक सतर्कतेने गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु गेल्या आठ-दहा दिवसांतील घटना पाहता गुन्हेगारीत कोणतीही घट झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे नागपूरकर गुंडगिरीमुळे धास्तावले आहेत. पावसाळी अधिवेशन नागपूरला कशासाठी घेतले याचा खुलासा अद्याप सरकारने केलेल नाही. परंतु या अधिवेशनानंतर तरी नागपूरधील गुन्हेगारी कमी होईल काय, असा सवाल येथील नागरिक विचारीत आहेत.