विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धुव्वा उडाल्यानंतर पक्षातील अनेक प्रमुख नाराज नेत्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धुव्वा उडाल्यानंतर पक्षातील अनेक प्रमुख नाराज नेत्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या असंतुष्ट नेत्यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर सोमवारी कृष्णकुंजबाहेर जमलेल्या जमावानेही या दोघांविरोधात घोषणा दिल्या. नांदगावकर आणि अभ्यंकर यांच्यामुळेच मनसेची वाट लागत असल्याचा आरोप या उपस्थित कार्यकर्त्यांमधून होत होता. एवढेच नव्हे तर अभ्यंकर यांच्या गाडीची काचही फोडून हा असंतोष व्यक्त करण्यात आला.
मनसेत राजीनामा सत्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक यांसह विविध भागांतील बहुसंख्य पदाधिकारी सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंजवर जमा झाले होते. काही झाले तरी आपण तुमच्यासोबतच आहोत हे सांगण्याकरता हे निष्ठावान कार्यकर्ते जमा होते. दुपापर्यंत ही गर्दी वाढतच होती. त्यामुळे त्यानंतर या पदाधिका-यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन ‘साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत. काहीही झाले तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाही,’ असे सांगितले.
मात्र, तत्पूर्वी येथील उपस्थित कार्यकर्त्यांमधील एका गटाकडून मनसेचे सरचिटणीस बाळा नांदगावकर आणि एसटी व बेस्ट वाहतूक सेनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्याविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केल्या. तर दुसरीकडे कुष्णकुंजसमोरच उभ्या असलेल्या अभ्यंकर यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये अभ्यंकर यांच्या गाडीची काचही फुटली गेली. त्यामुळे नांदगावकर तिथे फिरकलेच नाहीत तर अभ्यंकर पदाधिकारी जाईपर्यंत कृष्णकुंजबाहेरही पडले नव्हते.
डोंबिवली येथे मनसेच्या पदाधिका-यांनी नांदगावकर आणि अभ्यंकर यांच्याविरोधात रोष व्यक्त केला होता. त्यानंतर सोमवारी कृष्णकुंजवरही हाच प्रकार घडल्यामुळे या दोन्ही नेत्यांवर कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा काय रोष आहे हे राज ठाकरेंनी शोधून काढून त्यांना दूर ठेवावे, अशी माफक इच्छा कार्यकर्त्यांची आहे. भिवंडी येथे उमेदवारी देण्याकरता पैसे घेतल्याचा आरोप यापूर्वी नांदगावकर यांच्यावर झाला होता. मात्र, त्या वेळी हाजी अराफत शेख यांना याचा धनी बनवला गेला होता. त्यामुळेच अराफत शेख यांनी मनसे सोडली. त्यामुळे नांदगावकर यांच्याविरोधात प्रत्येक जिल्ह्यातच रोष असून अभ्यंकर यांच्याकडूनच राज ठाकरेंना चुकीचे फिडिंग केले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.