नवी मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग सातत्याने वादाच्या भोव-यात सापडत असून आता वंडर पार्कवरून पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई- नवी मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग सातत्याने वादाच्या भोव-यात सापडत असून आता वंडर पार्कवरून पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिकेने ६० कोटी रुपये खर्चून नेरूळमध्ये आलिशान वंडर पार्क हे उद्यान उभारले. मात्र त्यानंतर या उद्यानाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यासाठी पालिका प्रशासनही मुक्त हस्ते उधळण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच या उद्यानाच्या देखभालीसाठी महापालिकेने सुमारे ४ कोटी रुपयांच्या निविदेला मुदतवाढ दिली आहे.
वंडर पार्क या उद्यानावर झालेल्या मोठय़ा खर्चाच्या मुद्दय़ावरून पालिकेच्या स्थायी समिती आणि मासिक सभा सतत गाजत असतात. पालिकेने पोसलेला पांढरा हत्ती म्हणून या उद्यानावर टीका होऊन देखील या उद्यानांवरील प्रशासनाचे प्रेम कमी झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
पालिकेने नेरूळ मध्ये वंडर पार्क उभारताना जगातील सात आश्चर्य असलेल्या विख्यात पर्यटन स्थळांच्या प्रतिकृती उभारल्या. मात्र ६० कोटी रुपयांचा खर्च करूनही या प्रतिकृतींची उंची अत्यंत कमी असल्याने सशुल्क असलेल्या या उद्यानाकडे पर्यटकांनी पाठ फिरविली. परिणामी एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ करण्याचे स्वप्न भंग झाल्याने पालिकेलाच या उद्यानाच्या देखभालीच्या खर्चाचा भार पेलावा लागला. या अवाढव्य उद्यानाची देखभाल करण्यासाठी एका वर्षामध्ये चार कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. उद्यानातील विविध महागडय़ा पर्यटन सुविधा सामान्य माणसाला परवडत नसल्याने चक्क मासिक पास वितरीत करून प्रभात फेरीसाठी येणा-या नागरिकांना या उद्यानात वळविण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, तेही अपयशीच ठरले. त्यानंतरही स्थानिक नगरसेवकांच्या हट्टामुळे हा पांढरा हत्ती पोसण्याची जबाबदारी उद्यान अधिकारी पेलत राहिले आहेत.
आता पुन्हा या उद्यानाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे उद्यान चालवण्यासाठी कोणताही कंत्राटदार तयार होत नसल्याने पालिकेला या उद्यानावर खर्च करावा लागत आहे. या उद्यानामध्ये खासदार आणि आमदार निधी देखील वापरण्यात आला आहे. या निधीतून बांधलेले एक आलिशान गेस्ट हाऊसदेखील विरोधकांच्या टीकेचा विषय झाला होता. या गेस्ट हाऊसचा वापर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी त्यांच्या बैठकांसाठी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.