‘हागणदारीमुक्त शहर’ हा नवी मुंबई महापालिकेने केलेला संकल्प सिद्धीस नेला असून, या पार्श्वभूमीवर करावे गावातही मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई- ‘हागणदारीमुक्त शहर’ हा नवी मुंबई महापालिकेने केलेला संकल्प सिद्धीस नेला असून, या पार्श्वभूमीवर करावे गावातही मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी २ कोटी ९७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने ‘हागणदारीमुक्त शहर’ करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार प्रत्येक गाव, गावठाण, झोपडपट्टीत शक्य तेथे मलनिस्सारण वाहिन्या, फिरती शौचालये, एफआरपीसह दोन मजली शौचालये बांधण्यात आली आहेत. शहरातील ब-याचशा ठिकाणी शौचालये व मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने टाकले आहे. अन्य शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील तुरळक झोपडपट्टी विभाग वगळता पूर्णपणे हागणदारीमुक्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर करावे गावात मलनिस्सारण वाहिन्या टाकणे बाकी होते. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला होता. गावात मलनिस्सारण वाहिन्यांअभावी दैनंदिन गटारात शौचालयाचे पाणी जात होते. त्यामुळे ग्रामस्थांसह सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी या ठिकाणी २५० मिमी व्यासाच्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी सरकारी अंदाजपत्रकीय दरानुसार २ कोटी ८३ लाख रुपये खर्च येणे अपेक्षित होते; मात्र निविदाकारांनी निविदा भरल्यावर हा खर्च २ कोटी ९७ लाखांपर्यंत गेला आहे. हे काम एका वर्षात कंत्राटदाराने करायचे आहे.