येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेची पहिलीच निवडणूक बहु प्रभाग समिती पद्धतीने होणार असल्याने प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संभाव्य उमेदवारांचे बारीक लक्ष आहे.
नवी मुंबई- येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेची पहिलीच निवडणूक बहु प्रभाग समिती पद्धतीने होणार असल्याने प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संभाव्य उमेदवारांचे बारीक लक्ष आहे. यासाठी निवडणूक आयोगाने नुकतीच पालिका मुख्यालयात आयुक्त व पालिका अधिका-यांशी चर्चा केली. या निवडणुकीत प्रथमच संगणक प्रणालीचा वापर करून (जीआयएस प्रणाली) प्रभागरचना केली जाणार असल्याचे या वेळी निवडणूक अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय हस्तक्षेपाचा आरोप होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे. संगणक प्रणालीचा वापर करूनच सर्व प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या समितीने स्पष्ट केले आहे. यासाठी आयुक्त-उपायुक्त आणि साहायक आयुक्त या पालिका अधिका-यांची नेमणूक केली जाणार आहे.
एप्रिल महिन्यात होणा-या नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान समितीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देऊन महापालिका आयुक्त ए. एल. जऱ्हाड आणि संबंधित अधिकारीवर्गाशी विस्तृत चर्चा केली. यात प्रामुख्याने या महापालिका निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निश्चित केले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनाही संगणकीय महाजालावरील जीआयएस(ग्लोबल इन्फाम्रेशन सिस्टीम) प्रणालीचा वापर करून राज्य निवडणूक आयोगामार्फतच करण्यात येणार असल्याचे समितीमार्फत सूचित करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप टाळून प्रभाग रचनेपासून सर्वच निवडणूक प्रक्रिया पारदर्शकरीतीने राबवण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर करून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणारी नवी मुंबई ही पहिली महापालिका असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच ‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर’ या जीआयएस संगणकप्रणालीवर काम करणा-या सरकारी संस्थेच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त ए. एल. ज-हाड यांच्यासमवेत झालेल्या विशेष बैठकीत प्रभाग रचना पद्धतीविषयी विस्तृत चर्चा केली. यात नवी मुंबई महापालिकेमार्फत जनगणनेनुसार प्रगणक गटांच्या सीमा जीआयएस नकाशावर दर्शवून राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान समितीमार्फत देण्यात आल्या आहेत. या कामाकरता महापालिका आयुक्त ए. एल. जऱ्हाड यांनी विभाग कार्यालयनिहाय उपायुक्त व सहा. आयुक्त दर्जाच्या अधिका-यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी संबंधित विभाग अधिका-यांच्या सहयोगाने २०११ च्या जनगणनेनुसार विभाग कार्यालय हद्दीतील प्रगणक गटांच्या सीमा विभागाच्या जीआयएस नकाशावर दर्शवण्याची कार्यवाही करून ही माहिती राज्य निवडणूक आयोगास सादर करायची आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगामार्फतच संगणकीय प्रणालीद्वारे ‘गुगल’ नकाशावरून संबंधित विभागाच्या सॅटेलाइट इमेजच्या अनुषंगाने प्रगणक गटानुसार प्रभाग सीमांकन निश्चित करण्यात येणार आहे व प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान समितीने स्पष्ट केले.
पालिकेच्या डोक्याला ताप!
निवडणुकांना अद्याप चार महिन्यांचा कालावधी आहे, मात्र ‘वॉट्सअप’ या सोशल मीडियाने रविवारी प्रभाग सोडत असल्याचे मेसेज पसरवल्याने दिवसभर पालिका अधिकारी पत्रकारांना राजकीय पक्ष नेते विचारणा करत होते. प्रत्यक्षात सोडत नेमकी कधी काढली जाणार, याबाबत निश्चित निर्णय झाला नसल्याने दिवसभरात या अफवेच्या संदेशाने आजचा ‘संडे’ हा ‘फन डे’ न ठरता तापदायक ठरला. दरम्यान, या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. सोडतीबाबत रितसर कळवले जाईल, अशी माहिती पालिका उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी दिली.