ऐरोली उपनगर म्हणजे ‘धगधगते नगर’ म्हणूनच ओळखले जाते. या शहरात आजवर झालेल्या राजकीय हत्या पिस्तुलाचा वापर करूनच करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई- शहरात बेकायदा पिस्तूल वापरल्याप्रकरणी ५ वर्षात ११६ गुन्हे उघडकीस आले आहेत. म्हणून ऐरोली उपनगर म्हणजे ‘धगधगते नगर’ म्हणूनच ओळखले जाते. या शहरात आजवर झालेल्या राजकीय हत्या पिस्तुलाचा वापर करूनच करण्यात आल्या आहेत.
पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटू माळी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेल्या कुख्यात गुंडाच्या हत्येनंतर ऐरोलीतील शस्त्रपुरवठा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये १५० जणांना बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून तब्बल ११६ गुन्ह्यांमध्ये पिस्तूल व बंदुकांचा वापर करण्यात आला आहे. उत्तर भारतामधून अवघ्या पाच हजारांत पिस्तूल उपलब्ध करून दिले जात असल्याची माहितीदेखील माहीतगारांकडून मिळाली आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमधील शहरांमधून परप्रांतीय या शस्त्रांचा पुरवठा करतात.
नुकतेच नगरसेवक देविदास चौगुले हत्याकांडातील पाच आरोपी निर्दोष सुटले. या आरोपींतील सादिक बंगाली याला पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून शस्त्रपुरवठा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दिघ्यातील कुख्यात गुंड पांग्या भगत याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अनेक गुन्हे नोंदल्यावर पोलिसांनी या गुंडाला तडीपार केले. नगरसेवक अनंत काळे, पप्पू सावंत शिवसेनेचा कार्यकर्ता नितीन प्रभू, विल ठाकूर यांच्या हत्या गोळ्या झाडून करण्यात आल्या आहेत. कोपरखैरणे येथे पांडूपुत्र टोळीच्या गुंडांनी इस्टेट एजंटवर तीन वर्षापूर्वी गोळ्या झाडल्या होत्या.
याच पद्धतीने कृष्णा नाडार याच्यावर ऐरोलीमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. उस्मानाबादचे काँग्रेस नेते पवनराजे िनबाळकर व नुकतेच गाजलेले एस. के. बिल्डरचे सुनीलकुमार लोहारिया या बिल्डरची हत्या, अशा अनेक हत्या नवी मुंबईमध्ये गत पाच वर्षात गाजल्या आहेत. या सर्व हत्या गोळ्या झाडूनच करण्यात आल्या आहेत.
दरोडय़ाच्या घटनांमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना या पिस्तुलाच्या बळावर घडल्या आहेत. यामध्ये पंजाब बँक लुटताना शिवा नाडार घिसू मारवाडी टोळीने विरोध करणारे पीएसआय बाबा आढाव यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र या गुन्ह्यातील आरोपीदेखील निर्दोष सुटले, मात्र तत्कालीन गुन्हे पोलिस उपायुक्त अमर जाधव यांच्या पथकाने तीन दरोडेखोरांना चकमकीत पामबीचवर ठार केले होते. यामध्ये घिसू मारवाडी व शिवा नाडार यांचा समावेश होता. बिल्डरांच्या बांधकामाच्या ठिकाणी व कार्यालयातदेखील गोळीबार करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही बांधकाम व्यावसायिकांचाही समावेश आहे.