राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत येताच महागाई अवाक्याच्या बाहेर गेली असून त्यामुळे सर्वसामान्यांना खर्चाचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नवी मुंबई- राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत येताच महागाई अवाक्याच्या बाहेर गेली असून त्यामुळे सर्वसामान्यांना खर्चाचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच ऐन सणासुदीच्या काळात डाळींचे भाव गगनाला भिडल्याने सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
महागाई रोखण्यात राज्य सरकारला आलेल्या याच अपयशाचा आणि वाढत्या महागाईचा शनिवारी नवी मुंबईत मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला.
वाशी येथील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर शनिवारी महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शंभरहून अधिक मनसे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. दिवाळीच्या फराळात डाळींचा मोठा वापर होत असतो.
मात्र सध्या वाढलेले डाळींचे भाव पाहता नागरिकांची काळजी वाढली आहे. त्यामुळे आता सरकारने यात लक्ष घालून महागाई रोखण्यासाठी उपायोजना कराव्यात, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी सामान्य नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता.