महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेची लीज ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ला वाढवून देऊ नये. त्या जागेवर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी भव्य थीम पार्क उभारावे.अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
मुंबई महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेची लीज ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ला वाढवून देऊ नये. त्या जागेवर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी भव्य थीम पार्क उभारावे. मात्र रेसकोर्ससाठी नवी मुंबईत जागा द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
महालक्ष्मी येथे मोक्याच्या ठिकाणी असलेली महापालिकेची सुमारे ८ लाख ५५ हजार चौरस मीटरची जागा ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ला लीजवर देण्यात आली आहे. रेसकोर्सच्या स्थापनेपासून या जागेचा वापर केवळ मूठभर धनदांडगेच करत आहेत, परंतु रेसकोर्सच्या जागेची लीज ३० मे रोजी संपत असल्याने ती ‘टर्फ क्लब’ला पुन्हा वाढवून देऊ नये. त्याऐवजी या जागेवर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी थीम पार्क उभारावे, अशी मागणी आठवले यांनी केली. सध्या उद्यानाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. त्याबाबत वाद न घालता सर्वानी एकमताने निर्णय घ्यावा, असे आठवले म्हणाले.
महालक्ष्मी रेसकोर्सची लीज वाढवण्याचा निर्णय घेतल्यास रिपाइं तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही आठवले यांनी दिला. येत्या लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदाच रिपाइं दलितेतरांना तिकिटे देण्याचा विचार करत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.