नवी मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेऐवढे बहुमत राष्ट्रवादीकडे नव्हते.
नवी मुंबई- नवी मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेऐवढे बहुमत राष्ट्रवादीकडे नव्हते. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नव्हता. पण मंगळवारी सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन करण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत.
काँग्रेससह पाच अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्याचे आणि आघाडीचे पत्र राष्ट्रवादीने कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर केले आहे. त्यामुळे आता या महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवडय़ात या निवडणुकीची घोषणा कोकण विभागीय आयुक्त करतील.मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीला सशर्त पाठिंबा देताना आघाडीमध्ये सामील न होता काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्र नोंदणी करून आपले अस्तित्व वेगळे ठेवले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अखेपर्यंत मनधरणी करून देखील सत्तेच्या या आघाडीत पाठिंबा देऊन देखील काँग्रेस स्वतंत्र गट म्हणून बसणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाले नसल्याने इतर पक्षांच्या कुबडय़ा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करण्यात अडचण होती.
महापौर कोणत्या पक्षाचा होणार यावरून चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्याने पाठिंब्याचे सोपस्कार पूर्ण होणे आवश्यक होते.
सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीने काँग्रेसपक्षाकडे मदत मागितली होती.या प्रस्तावावर अधिकृत शिक्कामोर्तब रात्री उशिरा करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाचे ५२ नगरसेवक निवडून आले असून आणखी चार नगरसेवकांचा पाठिंबा असल्याशिवाय सत्ता स्थापन करण्यात अडचण होती.
मात्र शिवसेना आणि भाजपा युतीचे ४४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे अपक्ष नगरसेवक फोडून समांतर ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. हे करत असतानाच राष्ट्रवादीचे नेते भविष्यात कोणतीही राजकीय अडचण निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसचा देखील पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. या प्रयत्नांना यश आले असून आता राष्ट्रवादी ५२, अपक्ष ५ आणि काँग्रेस १० अशा ६७ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापौरपदाचे उमेदवार सुधाकर सोनावणे यांची बेलापूर मधील एका हॉटेलमध्ये अपक्षांचे गटनेते म्हणून निवड करून पाच अपक्षांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली आहे. मात्र मुरलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी आघाडीमध्ये सामील होण्याचे टाळून स्वतंत्र गटाची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे करुन मुत्सद्दी खेळी खेळली आहे. मात्र अपक्षांनी राष्ट्रवादी बरोबर गट बनविल्याने आता या नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या तालावर नाचावे लागणार आहे.
काँग्रेसकडून आता वैजयंती भगत, अविनाश लाड आणि मंदाकिनी म्हात्रे हे तीन नगरसेवक उपमहापौरपदाचे दावेदार आहेत. विषय समितीवर मात्र आणखी नऊ नगरसेवकांना संधी मिळणार आहे. पण पाच वर्षात ही संधी काँग्रेसला एक वेळच मिळणार आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष नगरसेवक दशरथ भगत,काँग्रेस प्रवक्ते सुधीर पवार,माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे,पराभूत झालेले नगरसेवक संतोष शेट्टी हे स्वीकृत नगरसेवकपदाच्या शर्यतीत असून काँग्रेसला स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. येत्या नऊ मे रोजी अपक्ष गटनेते आणि राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून निवडून आलेले सुधाकर सोनावणे यांच्या नावावर महापौर म्हणून शिक्कामोर्तब होणार आहे.
असा आहे फॉर्म्युला
नवी मुंबई निरीक्षक व माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून काँग्रेसला पाच वष्रे उपमहापौर विषय समित्या एक वर्षासाठी आणि स्थायी समिती तसेच स्वीकृत नगरसेवक निवडून देण्यासाठी मदत या शर्ती मान्य झाल्यावर पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे.