हिंसाचार, संघर्षाचे अंधकारमय दिवस मागे सोडून आता आता नवी पहाट उगवूं दे असे भावनिक आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले
श्रीनगर – हिंसाचार, संघर्षाचे अंधकारमय दिवस मागे सोडून आता आता नवी पहाट उगवूं दे असे भावनिक आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील जनतेला केले. अनेक महत्वाचे विषय कुशलतेने हाताळून त्यावर वेगाने समाधानकारक तोडगा काढणे आवश्यक आहे. प्रत्येक काश्मीरी नागरिकाला सन्माने जीवन जगण्याचा तसेच समान अधिकार आणि समान संधी मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबध्द असल्याचे मुखर्जीं म्हणाले.
काश्मीर विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभाला संबोधित करताना त्यांनी ही मते व्यक्त केली. राष्ट्रपती झाल्यानंतर ते प्रथमच काश्मीर दौ-यावर आले आहेत. हिंसाचाराने कुठलीही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे वेदना वाढते. प्रत्येक बाजूला त्रास होतो. उलट प्रेम, दया आणि संयमाने जखम अधिक वेगाने भरु शकते असे मुखर्जींनी सांगितले.
राज्यपाल एन.एन.व्होरा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लला आणि राज्यमंत्रीमंडळाचे अन्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विद्यापीठात मोठया प्रमाणावर सुरक्षाबंदोबस्त ठेवण्यात आला होता. कट्टरतावादी हुरियत प्रमुख सय्यद अली शाह गिलानी यांनी बंदचे आव्हान केले होते.