शुक्रवारपासून सुरू होणा-या नवीन वर्षात केंद्र सरकारमधील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.
नवी दिल्ली- शुक्रवारपासून सुरू होणा-या नवीन वर्षात केंद्र सरकारमधील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उचललेले हे प्रमुख पाऊल आहे, असे ते म्हणाले.
आजपासून तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठी मुलाखतीची पद्धत रद्द करण्यात येत आहे, असे मोदी म्हणाले. ट्विटरवरून मोदी यांनी ही घोषणा केली आहे. तत्पूर्वी नोएडा येथे १४ पदरी एक्स्प्रेस वेच्या उद्घाटन करताना मोदी म्हणाले की, तरुणांसाठी नववर्षानिमित्त आम्ही आगळी भेट आणत आहोत.
जी तरुणांना भ्रष्टाचारापासून मुक्त करेल तसेच कुणावरही त्यांना अवलंबून राहावे लागणार नाही. मोदी म्हणाले की, कुणाचा तरी प्रभाव वापरून नोक-या मिळवण्यासाठी साधन म्हणून मुलाखतीकडे पाहिले जाते. जे लायक आहेत, ते यात नागवले जातात. तंत्रज्ञान आणि गुणवत्तेच्या आधारे लायक असतील त्यांना थेट घरी नियुक्तीपत्र जाईल.