लव्ह जिहादच्या नावाने समाजात तेढ निर्माण करण्याचा आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न झाला.
मुंबई- लव्ह जिहादच्या नावाने समाजात तेढ निर्माण करण्याचा आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न झाला. आता चक्क पोलिसांच्या परिपत्रकात त्याचा समावेश करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कारस्थानांना बळकटी देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे.
नवरात्र उत्सवात, गरब्यात इतर धर्माचे लोक सहभागी झाल्यास अनुचित प्रकार होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती आता पोलिसांनीच काढलेल्या परिपत्रकांतून नवरात्र उत्सव मंडळाच्या मनात भरविण्यात आली आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरएसएस व तत्सम संघटना आपला अजेंडा राबवत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
भारत हा विविधतेने नटलेला देश असून इथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र आता पोलिसांनीच नवरात्र उत्सवात होणा-या कार्यक्रमात हिंदूशिवाय इतर धर्मिय लोक सहभागी झाल्यास अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा नवरात्रोत्सव मंडळांना दिलेल्या परिपत्रकात दिल्याने इथल्या सामाजिक ऐक्याला पोलिसांकडून मूठमाती दिली जात असल्याची टीका होऊ लागली आहे.
नवरात्रोत्सवाची सुरुवात पुढील आठवडय़ापासून होत असून त्यानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुतेक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. त्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घ्यावी लागते. या वर्षी परवानगी घेणा-या मंडळांसाठी नेहमीप्रमाणे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात पहिल्यांदाच लव्ह जिहाद आणि लव्ह त्रिशूळचा उल्लेख करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
इतकेच नव्हे तर मंडळांना सूचना करीत असताना त्यांनी इतर धर्मिय लोक नवरात्रोत्सवात सहभागी झाले तर अनुचित प्रकार घडू शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे. हा पोलिसांकडूनच समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका होऊ लागली आहे.
पोलिसांच्या खांद्यावर आरएसएसचा अजेंडा
मुंबईत नवरात्रोत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतो. त्यात सर्व धर्मीय लोक सहभागी होऊन सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करतात. दोन धर्माचे लोक एकत्र आल्यामुळे कुठे अनुचित प्रकार घडल्याचे एकही उदाहरण नसताना आता पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आरएसएसचा अजेंडा राबविला जात आहे.
लव्ह जिहाद सारख्या आरोपांचा परिपत्रकात समावेश करून त्याला बळकटी देण्याचे कामच पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या या पत्रकामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे या परिपत्रकाचा अपण धिक्कार करतो. त्याला आपण कायदेशीर मार्गाने विरोधही करणार आहोत.
सचिन सावंत, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश