भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडे वकृत्व कौशल्याचा अभाव आहे ते उत्तम वक्ते नाहीत असे मत व्यक्त करुन वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
झांसी – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडे वकृत्व कौशल्याचा अभाव आहे ते उत्तम वक्ते नाहीत असे मत व्यक्त करुन वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांना मोठी गर्दी उसळत असली तरी, त्यांच्याकडे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसारखे वकृत्वकौशल्य नाही. मोदींच्या सभांना उसळणारी गर्दी ही फक्त त्यांचे समर्थन करण्यासाठी असते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी नसते असे उमा भारती म्हणाल्या.
झांसी येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उमा भारती यांनी ही विधाने केली. त्या झांसीमधुन लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. अटलबिहारी वाजपेयी भाजपचे सर्वोत्तम वक्ते आहेत. जेव्हा तुम्ही मोदींच्या भाषणांची वाजपेयींबरोबर तुलना करता तेव्हा मोदींचे वकृत्व वाजपेयींच्या तोडीचे नसल्याचे तुमच्या लक्षात येईल. मोदींना फक्त पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या सभांना मोठी गर्दी उसळते असे उमा भारती म्हणाल्या.
अटलबिहारी वाजपेयी आमच्या पक्षाचे सर्वोत्तम वक्ते होते. भारतीय राजकरणात त्यांच्या वकृत्वाशी कोणीही बरोबरी करु शकत नाहीत असे उमा भारती म्हणाल्या. काँग्रेस नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी उमा भारती यांच्या मतांचे समर्थन केले. मोदी यांच्या भाषणात आशयाचा अभाव असतो तसेच मोदी जी भाषा वापरतात त्यावरही त्यांनी टीका केली.