नरोदा पाटिया प्रकरणाच्या निकालानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मपरिक्षण करावे असा सल्ला निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी मोदींना खुल्या पत्रातून दिला आहे
अहमदाबाद : नरोदा पाटिया प्रकरणाच्या निकालानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मपरीक्षण करावे आणि स्वत:च्या अवास्तव महत्त्वाकांक्षेसाठी आपल्यासारख्याच मानवांचा बळी देऊन सत्तेवर राहणे योग्य आहे का, याचा विचार करावा, असा प्रश्न निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी मोदींना खुल्या पत्रातून विचारला आहे. निकालापासून स्वत:ला दूर राखण्यासाठी मोदींनी गुगल प्लसवर स्वत:ला मुद्दामून गुंतवून ठेवले, असा आरोप भट यांनी केला आहे.
या प्रकरणात तुमच्या विश्वासू सहका-यांना आणि त्याचबरोबर हिंदुत्वाच्या चुकीच्या संकल्पनेमुळे दिशाभूल झालेल्या तथाकथित लढवय्यांना झालेल्या शिक्षेची तुम्हाला कल्पना असेलच. पण तरीही अत्यंत हुशारीने तुम्ही या दुर्दैवी लोकांपासून दूर राहिलात. आपल्यासारखाच एखादा मानव केवळ आपल्या धर्माचा नाही म्हणून त्याची हत्या करण्यास प्रवृत्त करणे योग्य आहे का याचा कधीतरी तुम्ही विचार केला आहे का, असा प्रश्न भट यांनी विचारला आहे.