लोकशाहीचा खरा अर्थ समजावून घेतला जात नसून नखावरची शाई हीच आपली लोकशाही असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केले.
पुणे- सध्याचे राजकारण हे जात, धर्म, भेदावर आधारित असल्याने जनता त्याच्यात गुरफटली जात आहे. लोकशाहीचा खरा अर्थ समजावून घेतला जात नसून नखावरची शाई हीच आपली लोकशाही असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समता परिषद संस्थेच्या वतीने आद्यक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते स्वीकारताना ते बोलत होते. याप्रसंगी महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर सुनील गायकवाड, समता परिषदेचे अध्यक्ष हनुमंत साठे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर, महापालिका गटनेते सिद्धार्थ धेंडे, डी. सी. एम़ शिक्षण संस्थेचे एम. डी. शेवाळे, बाळासाहेब जानराव आदी मान्यवर उपस्थित होते. २५ हजार रुपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
फ. मुं. शिंदे म्हणाले, सध्या सर्वत्र राजकीय भेसळ पाहायला मिळते. दलितांचे सरकार राज्यात आले पाहिजे. पक्षात काम करण्यापेक्षा जनतेवर प्रेम करणारे नाते महत्त्वाचे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांची इतिहासात दखल न घेतल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.
रामदास आठवले म्हणाले, मातंग समाजाला शिक्षणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मातंग समाजाने आवाज उठविला पाहिजे. पुण्यात आद्यक्रांतिकारक लहुजी साळवे यांचे स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी आघाडी सरकारने ५०० कोटींचा निधी मंजूर करावा.
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर उर्वरित निधी देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. फ. मुं. शिंदे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाली याचा बहुजन समाजाला अभिमान असल्याचे आठवले या वेळी म्हणाले.