महात्मा गांधींच्या दांडी पदयात्रेचे हुबेहूब दर्शन शिल्पांच्या माध्यमातून घडवण्यासाठी आयआयटी मुंबईत ‘दांडी सत्याग्रह स्मारक’ या ऐतिहासिक शिल्प स्मारक योजनेचे काम सुरू आहे.
मुंबई – महात्मा गांधींच्या दांडी पदयात्रेचे हुबेहूब दर्शन शिल्पांच्या माध्यमातून घडवण्यासाठी आयआयटी मुंबईत ‘दांडी सत्याग्रह स्मारक’ या ऐतिहासिक शिल्प स्मारक योजनेचे काम सुरू आहे. या योजनेतील दुस-या टप्प्यात श्रीलंका, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, बल्गेरिया, जापान, म्यानमार, तिबेट या देशांतील शिल्पकार विद्यार्थी पहिल्यांदाच एकत्र येऊन शिल्प साकारत आहेत.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय विभागाच्या वतीने आयआयटी मुंबईत ‘दांडी सत्याग्रह स्मारक’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सात ते २४ नोव्हेंबरदरम्यान झाली होती. तर दुस-या टप्प्याची सुरुवात नुकतीच झाली आहे. हा टप्पा २२ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या दांडी पदयात्रेतील अनेक आंदोलकांचे व त्या वेळच्या परिस्थितीचे शिल्प मुंबई आयआयटीतील उच्चस्तरीय दांडी स्मारक समितीच्या मार्गदर्शनाखाली साकारले जात आहे.
या दांडी स्मारक शिल्प स्मारक योजनेत महात्मा गांधींची १५ फूट धातूची उंच मूर्ती व त्यासोबत २४ भित्तीचित्रं आणि ८० आंदोलकांच्या मूर्तीही तयार केल्या जाणार आहेत. दांडी पदयात्रेच्या स्मारक शिल्प योजनेच्या निमित्ताने आयआयटीत पहिल्यांदाच राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय शिल्पकार एकत्र आले आहेत. दांडी पदयात्रेचे शिल्प तयार करण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अशा ८० शिल्पकारांचा सहभाग असला तरी यात देशातील नामवंत शिल्पकारांसह आंतरराष्ट्रीय शिल्पकारांचेही योगदान मिळत आहे.