धाकटया भावंडाच्या आगमनाशी कळत्या वयातल्या मुलांनी जमवून घेणं, हा सर्वकालीक आणि सार्वत्रिक प्रश्न असला तरीही वेगवेगळ्या समाजात आणि संस्कृतीत त्याचं स्वरूप आणि व्याप्ती वेगवेगळी असणार. भारतीय समाजात, दोन मुली असलेली बाई गरोदर असताना घरात असलेला ताण आणि तिसरं मूल ही मुलगी असेल तर घरात तिच्या मुलांच्या कानावर पडणारं, त्यांच्याच वडिलांचं आणि आजी-आजोबांचं बोलणं यामुळे नवीन बाळाचं आगमन या प्रश्नाची व्याप्ती बदलून जाते.
मूल वर्गात बसलेलं असेल तरी ते मनाने कुठे आहे, हे शिक्षकाला समजून घ्यायला लागतं. अनेकदा त्यासाठी मुलाच्या घरापर्यंत पोहोचावं लागतं. वर्गात असून नसल्यासारखं असण्याच्या मुलांच्या या अवस्थेचा अस्वस्थ करणारा एक अनुभव मध्यंतरी मला आला. काही निमित्ताने एका शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांशी मी गप्पा मारत होते. माझ्याजवळ बसलेली एक बारीकशी मुलगी माझ्या सगळ्या बोलण्यावर मान डोलावत होती, पण ती इतकी विझून गेल्यासारखी झालेली होती की, ती कुठेतरी अगदी हरवलेली आहे हे मला कळत होतं. काहीतरी बिनसलेलं असतानाही सामाजिक अपेक्षांनुसार वागायचा त्या चिमुरडीचा प्रयत्न बघून मला थोडं उदास वाटलं होतं. माझ्यासारख्या बाहेरच्या व्यक्तीच्या जे लक्षात आलं होतं ते अर्थातच तिथल्या शिक्षकांच्याही लक्षात आलं होतं. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा असल्याने वर्गातील मुलांची संख्या मर्यादित होती.
शिक्षकांना मुलांच्या मनोवस्थेतील बदल लक्षात येईल एवढा शिक्षकांचा व मुलांचा परस्पर संपर्क होता. छोटया शाळांचं महत्त्व जॉन होल्ट्स या शिक्षणतज्ज्ञाने सांगून ठेवले आहे, त्याची आठवण झाली. एकाच ठिकाणी सोयी पुरवणं सोपं जातं यासारख्या व्यवस्थापनाच्या कारणासाठी, मोठया शाळा काढणं, त्याचं एखाद्या कारखान्याच्या धर्तीवर व्यवस्थापन करणं, हे शिक्षक-विद्यार्थी, शिक्षक-समाज यांच्या जैवसंबंधांना मारक ठरतं आणि हे संबंध हा शिक्षणाचा आत्मा आहे, असं त्याचं मत होतं. असो. पहिलीतली सायली एवढय़ा हरवलेल्या मनस्थितीत होती याचं कारण सरांनी मला सांगितलं. तिच्या आईला तिसरं बाळ झालेलं होतं. गेले तीन महिने तिची आई माहेरी होती आणि सायली शाळेसाठी आईपासून दूर राहिलेली होती.
ही घटना मनात ताजी असताना, ‘मिळून सा-याजणी’ या मासिकात, मंगला साने यांचा एक लेख वाचनात आला. अमेरिकेतील शाळेत धाकटय़ा भावंडाच्या जन्मासाठी सात वर्षाच्या मोठय़ा भावंडाची कशी तयारी करून घेण्यात आलेली होती, याची ती गोष्ट होती. ज्यांच्या घरी बाळ येणार होतं, अशा सात-आठ वर्षाच्या मुलांसाठी शाळेत ‘सिबिलग कोर्स’ चालवला जात होता. ‘आता आई तुझी आणि बाळाची’ ही जाण तिथे रुजवली जात होती. बाळाचं स्वागत हा एक समारंभ बनून जाईल, अशाप्रकारे मुलांना त्या प्रक्रियेत सहभागी व्हायला शिकवलं जात होतं. बाळ सहा महिन्याचं झालं तेव्हा आईला व बाळाला शाळेत आमंत्रित करण्यात आलं. शाळेत मुलाच्या वर्गाने स्वागताचा थाट उडवून दिला होता. फळ्यावर ‘वेलकम’ लिहिलेलं होतं, मुलांनी तयार केलेली शुभेच्छापत्रं फळ्यावर लावलेली होती. कुणाच्या मुठीत बाळासाठी चॉकलेट, कुणाच्या मुठीत बिस्कीट तर कुणाच्या मुठीत फुलं होती. मुलांनी बाळाच्या गालाला हात लावला, त्याच्या मुठीत बोट दिलं, त्याला माऊ, पिल्लू अशी नावं दिली. आपलं बाळ सगळ्यांना किती हवंहवेसं आहे, ते दादाला उमगलं. हे बाळ आपलं भावंड असण्याचा आनंद दाटून आला. हे सगळं वाचताना मला ते हॉलिवुडच्या फिल्मसारखंच वाटत होतं. सुंदर पण आपल्यासाठी परीकथेसारखं.
आपल्या शाळेतली सायलीदेखील धाकटया भावंडाच्या आगमनाने अस्वस्थ्य झालेली होती, पण कदाचित फक्त ‘सिबिलग रायव्हलरी’ किंवा धाकटयाचा हेवा आणि आईपासून दूर राहणं एवढयापुरतं मर्यादित असं तिच्या अस्वस्थतेचं कारण नसेलही. धाकटया भावंडाच्या आगमनाशी कळत्या वयातल्या मुलांनी जमवून घेणं, हा सर्वकालीक आणि सार्वत्रिक प्रश्न असला तरीही वेगवेगळ्या समाजात आणि संस्कृतीत त्याचं स्वरूप आणि व्याप्ती वेगवेगळी असणार. भारतीय समाजात, दोन मुली असलेली बाई गरोदर असताना घरात असलेला ताण आणि तिसरं मूल ही मुलगी असेल तर घरात तिच्या मुलांच्या कानावर पडणारं, त्यांच्याच वडिलांचं आणि आजी-आजोबांचं बोलणं यामुळे नवीन बाळाचं आगमन या प्रश्नाची व्याप्ती बदलून जाते. वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव, दारिद्रय, कुपोषण अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांचा परिणाम हा घरातील नवीन बाळाच्या जन्माच्या घटनेवर वेगवेगळ्या प्रकारे होणार. त्यात एकच गोष्ट नक्की असणार आणि ती म्हणजे हा प्रभाव अत्यंत व्यामिश्र असणार.
त्यामुळे आपल्या शाळांमधल्या सायलींसाठी ‘सिबिलग कोर्स’ तयार करणं हे अधिक कठीण काम असणार आहे. ‘नवीन भावंडांच्या जन्माचं स्वागत करण्यास मुलांना शिकवावं व त्यासाठी शाळेत कार्यक्रम आयोजित करावेत’ असा आदेश शासनाने देऊन हे घडवून आणावं, असं म्हटलं तर ते ‘सर्व लोकांनी गाण्यात बोलावे’ या गोष्टीतल्या राजाच्या फतव्याइतकंच विनोदी ठरेल. मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी वाजतगाजत समारंभपूर्वक शाळेत आणावं, या शासकीय आदेशाचंही असंच काहीसं झालं. शिक्षकांना नवीन नवीन कामांना जुंपण्याचा शासकीय आडमुठेपणा म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं गेलं. आपला समाज वैविध्याने एवढा भरलेला आहे की, असा शिक्षक-विद्यार्थ्यांमधील जो संवाद वर्गखोलीत आकाराला येईल, त्यामध्येदेखील प्रचंड विविधता असणार. मुलांच्या वर्तमानातील आस्थेचा विषय आणि अभ्यासक्रम यांची सांगड घालण्याचं काम शिक्षक केवळ स्वत:च्या सृजनशीलतेच्या माध्यमातूनच घडवून आणू शकतात.
जगण्याची व शिक्षणाची घातलेली अशी सांगड मुलांच्या सृजनशील कामातून व्यक्त करण्याची संधी शिक्षक मुलांना देऊ शकतात.
मित्राच्या धाकटया भावासाठी शुभेच्छापत्र तयार करणं, तो आपल्या वर्गात येणार म्हणून स्वागताचे संदेश लिहिणं, चित्रं काढणं, त्याच्यासाठी कविता म्हणणं या प्रत्येक कृतीला शैक्षणिक मूल्य आहे व त्या कृतीमागचा हेतू हा मुलांच्या दैनंदिन जगण्याशी जवळून संबंधित आहे. शाळेत असे कोणते उपक्रम कोणत्या उद्देशाने राबवले जातात, याचा वार्षिक अहवाल शाळेने पालकांना पाठवला तर शालेय शिक्षणात होणा-या बदलांची दिशा सामान्य पालकांनाही समजू शकेल. शासनाने फतवा काढून आपल्या स्वायत्ततेवर घाला घालू नये, असं शिक्षकांना वाटत असेल तर अभ्यासक्रमात कागदोपत्री झालेले बदल वर्गखोलीत प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयोग शिक्षकांनी सुरू केले पाहिजेत.
बंगळूरुमधील ‘सेंटर फॉर लर्निंग’ या शाळेने केलेल्या अशा प्रयोगांचा वार्षिक अहवाल मध्यंतरी मला वाचायला मिळाला. एखाद्या गोष्टींच्या पुस्तकाइतका मनोवेधक होता तो. स्पर्धा किंवा परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांची नावं, शाळेने वर्षभरात कोणकोणत्या स्पर्धामध्ये भाग घेतला वगरे काहीही त्याच्यात नव्हतं. त्यामुळे फक्त नावं आलेल्या मुलांच्या पालकांसाठीच नाही तर मुलांच्या वाढण्यात व शिक्षणात रस असलेल्या कोणासाठीही तो वाचनीय झाला होता. ही निवासी शाळा असल्याने मुलं व शिक्षक रोज शाळेतच जेवतात. शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी ठरावीक वेळ स्वयंपाकघरात काम करणं अपेक्षित असतं. हे स्वयंपाकघर कसं चालतं व मुलं त्याच्यातून काय काय शिकतात, याची माहिती त्या अहवालातील एका भागात देण्यात आलेली होती. या शाळेतील मुलं शेजारच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांबरोबर इंग्रजी संभाषण व नाटक या विषयांवर काम करतात. या उपक्रमाचा दोन्ही मुलांना होणारा फायदा व त्याचं शैक्षणिक मूल्य याविषयीची माहितीदेखील अहवालात होती.
शाळेने केलेले प्रकल्प, पालक बैठकीत व विद्यार्थी बैठकीत होणा-या चर्चा व अशा चर्चा घडवून आणण्यामागची शाळेची भूमिका अशा इतरही काही गोष्टींविषयीची माहिती या अहवालात होती. शिक्षणाचा संबंध जगण्याशी जोडला पाहिजे, हा विचार आता केवळ विचारवंतांच्या ग्रंथात नाही, तर तो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयामध्येदेखील तपशिलात स्पष्ट करण्यात आलेला आहे. शाळांमधून हे घडून यावं यासाठी मूल्यमापनाची पद्धतदेखील बदलण्यात आलेली आहे. शाळेत आता परीक्षांना महत्त्व नाही, याचा अर्थ असा की आदर्श उत्तरांचे रट्टे मारण्यात मुलांचा वेळ घालवायचा नसून, अभ्यासक्रमाची व जीवनाची सांगड घालून, मुलांना वेगवेगळे शैक्षणिक अनुभव देण्यासाठी तो वेळ खर्च करायचा आहे. मुख्य प्रवाहातील शाळा हे कशाप्रकारे करत आहेत, हे समजण्यासाठी शाळेचा अहवाल हा एक चांगला मार्ग असू शकतो, असं मला वाटतं. एखाद्या प्रयोगशील शिक्षकाने त्याची सुरुवात केली, तर शिक्षणव्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचे गावोगावीच्या शिक्षकांचे प्रयत्न लोकांसमोर येतील आणि दर्जेदार शिक्षणाविषयी समाजामन तयार करण्याचं एक प्रभावी साधन समाजाला मिळेल.