लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलेले हे सरकार लोकशाहीच्या आड धर्मवाद जोपासू पाहत आहे. या देशाच्या विविधतेमध्ये दडलेल्या एकतेच्या सामर्थ्यांला नख लावण्याचे कार्यक्रम मोदी सरकारने संघाच्या माध्यमातून सुरू केले आहे. त्यामुळे एकीकडे देशातल्या विकासकामांना अडथळे निर्माण करून दुसरीकडे धर्मवादाचे भूत उभे केले जात आहे. देशातल्या जनतेने सरकारच्या या लोकशाही विरोधातील प्रवृत्तीला रोखण्यासाठी सगळय़ा सामर्थ्यांने प्रतीकार करावा लागेल. महाराष्ट्राचे शक्तिस्थान असलेल्या सहकारावर कुऱ्हाड चालविण्याचे काम हा त्याच मोहीमेचा एक भाग आहे.
महाराष्ट्रातील सहकार मोडून काढण्याचा चंग फडणवीस सरकारने बांधलेला आहे. आता प्रत्येक सहकारी संस्थेत सरकारचा एक प्रतिनिधी आणि एक सामाजिक प्रतिनिधी अशा दोन नव्या प्रतिनिधींची नेमणूक सरकारतर्फे केली जाणार आहे. उद्देश अर्थातच उघड आहे. सहकार क्षेत्र हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस या दोन पक्षाचे शक्तिस्थान आहे. भाजपा किंवा अन्य काही पक्षांची फार तुरळक मंडळी सहकारात काम करतात. आज महाराष्ट्रात सहकारी चळवळीत २२ लाख लोकांना रोजगार आहे. राज्य शासनानेसुद्धा एवढय़ा लोकांना रोजगार दिलेला नाही.
रेल्वेनंतर सगळय़ात मोठा रोजगार देणारे व्यवस्थापन सहकार क्षेत्र आहे. सहकारात भ्रष्टाचार आहे, वशिलेबाजी आहे, हे सगळे आक्षेप फक्त सहकारावरच आहेत, असे नाही ते सर्वच क्षेत्रावर आहेत. पण सहकारावर विरोधक तुटून पडतात आणि ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. सहकारामधील दोषांचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु ज्या सहकाराला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो त्या सहकाराला प्रत्येक वर्षाला २५-२५ हजार कोटी रुपयांची ठेव वाढत असते. याचा दुसरा अर्थ काय घ्यायचा.
जो सामान्य माणूस सहकारावर एवढा विश्वास ठेवतो आणि आपल्या कष्टाची कमाई सहकारात गुंतवायला राजी होतो त्या सामान्य माणसाचा सहकारावर विश्वास आहे. ते सहकार क्षेत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शक्तिस्थान आहे. मग ते धनंजयराव गाडगीळ असतील, यशवंतराव चव्हाण असतील, वैकुंठभाई मेहता असतील, वसंतदादा पाटील असतील या सगळय़ांनी जाणीवपूर्वक सहकार वाढवला आणि मोठा केला. यशवंतरावांना अपेक्षित असलेली कृषी औद्योगिक क्रांती त्याचा मूळ पाया सहकार हाच आहे. ग्रामीण भागातील आजचे महत्त्वाचे आर्थिक परिवर्तन या सहकाराने केलेले आहे. तो सहकार मोडून काढायचा हा या सरकारच्या धोरणाचा एक भाग आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रात सामान्य तरुणाची माथी भडकतील, अशा पद्धतीने एका सुप्त कटकारस्थानाची सुरुवात आज विचापूर्वक झालेली आहे. भाजपाकडून महाराष्ट्रातील प्रामुख्याने शहरातील महाविद्यालयांतील जे विद्यार्थी २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदार होतील. त्या तरुणांवर जात, धर्म यांचा पगडा कसा बसेल, अशा प्रचाराची एक आखणी भाजपाच्या विचार केंद्रबिंदूकडून (थिंक टँक) केली जात आहे. त्याचा तपशील तपासला तर लाख लाख रुपये पगारावर तरुण बुद्धिमंत मुलांना विविध महाविद्यालयांत जात धर्माचा प्रचार करणारी आणि गांधी, नेहरू, देशाची स्वातंत्र्य चळवळ या विरोधात मानसिकता तयार होईल, अशी भाषणे आयोजित केली जात आहेत. या तरुणांनी महिन्यांतून पाच व्याख्याने विविध महाविद्यालयांत द्यायची आहेत.
या व्याख्यानांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो की नाही, याचा अंदाज घेण्याकरिता काही गट तयार केले जात आहेत. भाजपाच्या एकूण शिस्तबद्ध वैचारिक भूमिकेचा हा भाग कौतुकास्पद वाटला तरी अशा प्रकारचे चिंतन इतर राजकीय पक्षात होते आहे का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अपसात लढून भाजपाच्या हातात सत्ता दिली. निदान महाराष्ट्रात तरी हा प्रयोग भाजपाच्या फायद्याचा ठरला. अजून तीन साडेतीन वर्षे?ही लढाई लढायची आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार हे एकमेव धुरिण नेते आहेत. राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊ शकणारे आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये आज महाराष्ट्राचा म्हणता येईल, असा नेता कोण? सत्तेतून बाहेर राहून १४-१५ महिने झाले आहेत. या १५ महिन्यांत भाजपाने नेमके काय केले? दिलेली आश्वासने पाळली का? लोकांची किती फसवणूक केली? महागाई कमी झाली का? की १०० पट वाढली? या कोणत्या विषयावर सामुदायिकपणे हल्ला करण्याची भूमिका काँग्रेस घेत नाही.
विधानसभेवर नेण्यात आलेला काँग्रेसचा मोर्चा भव्य होता पण हा कार्यक्रम केवळ शक्तिप्रदर्शनापुरता मर्यादित नाही. तर जिल्ह्याजिल्ह्यांतील कार्यक्रम राजकीयदृष्टय़ा भाजपाच्या भूमिकेला चोख उत्तर देऊन त्यातून वातावरण बदलू शकेल, अशा पद्धतीने तयार केला जात आहे का? काँग्रेसला सत्तेची सवय आहे, राष्ट्रवादीला आहे. चळवळीची, आंदोलनाची सवय काँग्रेसवाल्यांना नाही त्यामुळे असेल कदाचित. परंतु जे भाजपाचे सरकार आज सत्तेवर आलेले आहे त्यांनी पंधरा वर्षे विरोधात काढलेली आहेत. काँग्रेसने सत्तेच्या बाहेर बसून लोकांसोबत राहण्याची भूमिका घेतली तर सत्ता मिळवायला भाजपाला १५ वर्षे लागली. काँग्रेसला आणखी तीन वर्षानंतर सत्ता मिळू शकेल. कारण भाजपाच्या ज्या राजवटीवर लोक खूश होते, अशी स्थिती कधीही नव्हती.
एका नाईलाजाच्या नकारात्मक भूमिकेतून लोकांनी काँग्रेसच्या विरुद्ध मते टाकून भाजपाला विजयी केले. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळेल, ही गोष्ट अशक्य आहे. पण काँग्रेस नको म्हणून भाजपाचा विजय झाला, असा पुढच्या निवडणुकीत भाजपा नको, म्हणून काँग्रेसचा विजय होणार आहे का? या देशात निवडणुका नकारात्मक होतात. कार्यक्रमावर, देशाच्या विकासाच्या भूमिकेवर, सव्वाशे कोटींचा देश एकत्र ठेवायचा आहे, ही भावना घेऊन राष्ट्र उभी करण्याची जी कल्पना असते, त्या कसोटीवर काँग्रेसला यश मिळायला हवे. कारण हा देश तसा एका धर्माचा, जातीचा नाही. तसा तो एका विचारसरणीचाही नाही. आज हिंदू राष्ट्रवादाची कल्पना भाजपा सरकारकडून रुजवली जात आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या भूमिकेला कडाडून विरोध करण्याची भूमिका काँग्रेसला वठवावी लागेल.
सव्वाशे कोटींच्या देशातील सर्वसामान्य जनतेला ही भूमिका पटवून द्यावी लागेल. जाती-धर्माच्या नावावर मते मागणा-यांना लोकशाहीची व्यवस्था स्वीकारल्याचा बहाणा करता येणार नाही आणि म्हणून या देशाच्या आत्मिक आणि विविधतेमधील एकतेच्या सामर्थ्यांची जोपासना करण्याचे उत्तरदायित्व काँग्रेसवर आहे हा विचार घेऊन आज काँग्रेसवाले काम करत आहेत. प्रश्न काँग्रेस सत्तेत यायला पाहिजे, एवढय़ा पुरता मर्यादित नाही. सव्वाशे कोटींचा देश जगात सातव्या क्रमांकावर आज सन्मानाने उभा राहिला.
त्या देशाला पुन्हा ५० वर्षे मागे नेण्याचा कार्यक्रम भाजपाची राजवट करेल शेती, सहकार, शिक्षण, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान या सगळय़ा विषयात सव्वाशे कोटींचा देश कुठे गेला आणि कसा गेला, यामागची धोरणे काय होती? हा सगळा विषय तरुणांना समजून सांगायला लागेल. विशेषत: गेल्या २५ वर्षाच्या धोरणानंतर विज्ञान-तंत्रज्ञानात या देशाने जी झेप घेतली आणि आधुनिक युगाची दारे तरुणांना उघडून दिली त्यामध्ये काँग्रेस-पक्षाच्या धोरणात्मक भूमिकेचा वाटा किती होता? याची माहिती आज सांगितली जात नाही. एवढा मोठा देश एका दिवसात उभा राहू शकत नाही. त्याकरिता नियोजन आणि व्यवस्थापन या दोन महत्त्वाच्या गोष्टींची गरज आहे. देश आणखी मागे जायचा नसेल तर लोकांच्या डोक्यात भरवले जाणारे धार्मिक घोळ, धर्मवाद, जातवाद आणि हिंदुत्ववाद यापासून लोकशाहीवादाकडे या देशाला पुन्हा एकदा नेण्याचे उत्तरदायित्व काँग्रेसकडे आहे, या प्रश्नावर काँग्रेस नेमके काय काय करेल, या प्रश्नाच्या उत्तरात उद्याचे काँग्रेसचे यश दडलेले आहे.