राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) भाजपशी फारकत घेतली. त्यामुळे गेल्या १७ वर्षापासून असलेले या दोन्ही पक्षांचे संबंध आणि सहकार्य अखेर संपुष्टात आले. यामुळे सध्या तरी दहा महिन्यांनी होणा-या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर भाजप एकटा पडला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) भाजपशी फारकत घेतली. त्यामुळे गेल्या १७ वर्षापासून असलेले या दोन्ही पक्षांचे संबंध आणि सहकार्य अखेर संपुष्टात आले.
यामुळे सध्या तरी दहा महिन्यांनी होणा-या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर भाजप एकटा पडला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी राजनाथ सिंह आल्यानंतर या पक्षात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रस्थ वाढू लागले.
एवढेच नव्हे, तर मोदी यांची पंतप्रधानपदाचे भाजपचे म्हणजे पर्यायाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार अशी भलामणही करण्यात येऊ लागली. गुजरातमधील दंगलीमुळे व मोदींनी अल्पसंख्यांकांविरुद्ध घेतलेल्या पक्षपाती भूमिकेमुळे धर्मनिरपेक्षतेचा कट्टर पुरस्कर्ता असलेल्या संयुक्त जनता दलाला भाजपची ही चाल सहन करणे शक्य नव्हते. जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याबद्दल आपली नाराजी स्पष्टपणे जाहीरही केली.
पण पक्षात मोदींना अडवाणी गटाचा सक्त विरोध असूनही या गटाचा तसेच जेडीयूचा विरोध दुर्लक्षून मोदी यांची प्रतिमा उजळ करण्याची राजनाथ सिंह यांची चाल सुरूच राहिली. जेडीयूच्या विरोधामुळे मोदी यांचे नाव पंतप्रधापनपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याच्या धोरणाला जरी मुरड घालण्यात आली. मात्र, भाजपच्या गोव्यातील कार्यकारणीच्या बैठकीत मोदी यांना येत्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराचे प्रमुख करण्यात आले.
यामुळे नाराज झालेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी या बैठकीवर तर बहिष्कार टाकलाच व दुस-या दिवशी राजीनामा देण्याचे नाटक केले. हा राजीनामा नंतर त्यांनी मागे घेतला, ही गोष्ट वेगळी. पण मोदी यांचे भाजपमध्ये प्रस्थ वाढल्याने अस्वस्थ झालेल्या नितीश कुमार आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी भाजपपासून फारकत घेण्याचे दोन दिवसांपूर्वीच संकेत दिले होते. त्याप्रमाणे जेडीयूने रविवारी भाजपची साथ सोडण्याची अधिकृतपणे घोषणा केली. त्याचप्रमाणे बिहारच्या आघाडी सरकारमध्ये असलेल्या भाजपच्या ११ मंत्र्यांनी आपले काम बंद केल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या मंत्र्यांना बडतर्फ करण्याची शिफारस बिहारचे राज्यपाल डी. वाय. पाटील यांना केली आहे.
येत्या १९ तारखेला बिहार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून मुख्यमंत्री नितीश कुमार आपले बहुमत सिद्ध करणार आहेत. भाजपशी फारकत घेतल्याने बहुमत सिद्ध करण्यास जेडीयूला चार मते कमी पडतील, काँग्रेस व अपक्ष सदस्यांच्या मदतीने हे बहुमत सहज सिद्ध होईल, यात शंका नाही. भाजपविरुद्ध जेडीयूने कुठलाही पडदा न ठेवता यापूर्वीच दंड थोपटले होते, असेच यातून दिसते. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांची पाटण्यात २३ जूनला जाहीर सभा होणार आहे. पाटण्यातील ज्या शाळेच्या मैदानावर ही सभा होती ते शाळेचे मैदानही सभेसाठी देण्यास नितीश कुमार यांनी नकार दिला आहे.
यामुळेच राजनाथ सिंह यांनी बिहारमधील भाजप नेत्यांना व बिहार मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आता नितीश कुमारांना भेटण्याची काही गरज नाही, असा आदेशच दिला होता. त्यानंतर बिहारमधील भाजप नेते अधिकच आक्रमक झाले. त्यांनी थेट नितीश कुमारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. भाजपचे म्हणणे असे की, २०१०मध्ये विधानसभा निवडणुकीत मतदारांनी रालोआला मते दिली होती, जेडीयूला नव्हेत. जेडीयू जातीय भाजपपासून वेगळा झाल्याने काँग्रेसच्या गोटात समाधानाचे वातावरण असून हा घटनाक्रम काँग्रेसला अनुकूल आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाच्या दृष्टीने हा शुभशकूनच म्हटला पाहिजे.
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवून तेथील सत्ता भाजपकडून हिसकासवून घेण्यात काँग्रेसला यश आल्यानंतर जेडीयू-भाजप फारकत ही काँग्रेसला दुसरी मोठी अनुकूल घटना आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा उत्साह पसरला आहे. काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षाला जेडीयूसारख्याच धर्मनिरपेक्ष पक्षाची साथ २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिळाली तर जातीय पक्षांना धुळ चारणे कठीण जाणार नाही. जेडीयू आणि भाजप वेगळे झाले असले व काँग्रेसच्या मदतीने नितीश कुमार यांचे सरकार १९ तारखेला बचावले तरी राष्ट्रीय पातळीवरील राजकीय ध्रुवीकरणाचे वा राजकीय पक्षांच्या आघाडय़ांचे चित्र सध्या किंवा नजीकच्या काळात स्पष्ट होणे कठीण आहे.
जेडीयू सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जवळ येईल असे वाटत असले तरी ते काहीसे कठीण आहे. याचे प्रमुख कारण असे की, जेडीयू-भाजप काडीमोड घेत आहेत हे समजल्याबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी नितीश कुमार यांना तात्काळ दूरध्वनी करून तिसरी आघाडी करण्याबाबत वाटाघाटी सुरू केल्या. तिस-या आघाडीचे पडघम वाजू लागतात की, काय असे वाटू लागले आहे. त्यातच माकप नेते प्रकाश कारत आणि तेलगू देशमचे चंद्राबाबू नायडू यांनीही जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांची भेट घेऊन तिस-या आघाडीबाबत चर्चा केली.
जेडीयूला जर तिस-या आघाडीत रस असेल तर त्या पक्षाची काँग्रेसशी जवळीक कशी काय होऊ शकेल? म्हणजे जेडीयूसहित तिसरी आघाडी आणि काँग्रेसशीही जवळीक या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाहीत. जेडीयू आणि काँग्रेस यांची जवळीक होण्यात आणखी एक अडचण म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे बोलभांड नेते लालूप्रसाद यादव. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची संभाव्य तिसरी आघाडी आणि त्यांची काँग्रेसशी जवळीक या दोन्ही गोष्टी लालूप्रसाद यादव यांना मानसिक आणि राजकीयदृष्टया परवडणा-या नाहीत, हे उघड आहे.
तिसरी आघाडी होते आहे हे कळल्याबरोबर लालूंनी त्या आघाडीची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, या आघाडीतील सर्व पक्षांचे नेते पंतप्रधान होण्यासाठीच एकत्र येत आहेत तर ती आघाडी कशी बनणार व कशी टिकणार? तिसरी आघाडी होऊन बिहारमध्ये नितीश कुमारांचे राजकीय पारडे जड व्हावे, हे लालूंना परवडणारे नाही. याच कारणासाठी जेडीयू व काँग्रेस जवळ येणेही लालूंना नको आहे, हे उघड आहे. लालूप्रसाद यांनी यूपीए सरकारला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे.
सध्याची प्रवाही राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसने जेडीयू सरकारला बिहारमध्ये सध्या मर्यादित पाठिंबा दिला तरी काँग्रस जेडीयूच्या फार जवळ जाण्याची शक्यता नाही. भाजप व जेडीयू हे परस्परांपासून वेगळे झाल्याने भाजपची येत्या लोकसभा निवडणुकीतील ताकद निश्चित कमी होणार आहे. काहीही झाले तरी काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन काँग्रेसच्या पथ्यावर पडणारे आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष पक्षाची एकजूट देशाला सुशासन देऊ शकेल. असे सुशासन आणण्यासाठी काँग्रेस सदैव पुढाकार घेईल.
[EPSB]
‘समृद्ध’ कचरा
एखाद्या समाजाची वा देशाची समृद्धी वाढू लागते तेव्हा वरीलप्रमाणे सगळ्या गोष्टींचा सुळसुळाट तर होतोच, शिवाय आपल्याला अजूनपर्यंत न भावलेल्या वा न जाणवलेल्या आणखी एका गोष्टीची या वाढणा-या बाबींमध्ये भर पडते. ती गोष्ट म्हणजे कचरा…
[/EPSB]