लघु पाटबंधारे खात्याने ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्षच न दिल्याने गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मंडणगड- पाणीटंचाईमुळे चिंचाळी धरणात साठवून ठेवण्यात आलेले पाणी यंदा नदीला सोडण्यात यावे, या मागणीसाठी पंचक्रोशीतील सर्व गावे आग्रही असतानाही लघु पाटबंधारे खात्याने ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्षच न दिल्याने गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
चिंचाळी धरणाचे सिंचन क्षेत्रात असलेल्या लोकरवण, चिंचाळी, पन्हळी, वाकवली, दिप्तलवण या गावांना एप्रिल महिन्यापासूनच पाणी कमतरतेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. कमी पर्जन्यमानामुळे जानेवारी महिन्यात विहिरींचा जलस्रेत खालावल्याने ग्रामस्थांनी सभापती, तहसीलदार व लघु पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांशी संपर्क साधत आपली कैफियत मांडली व जमिनीतील पाण्याचा स्तर टिकून राहण्यासाठी नित्यनियमाने नदीला पाणी सोडत राहण्याची विनंती केली.
मात्र गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करूनही गावाचे शिवारात शेकडो लिटर टीएमसी पाणी विनावापर वाया जात असतानाही ग्रामस्थांना या पाण्याचा लाभ झालेला नाही. गेली अनेक वर्षे धरणाला गेलेल्या तडय़ांमुळे एप्रिल महिन्यातच धरणातील पाणीसाठा खालावत आहे.
काही वेळा तर धरणक्षेत्राचा तळही दिसत असे. गेल्या काही वर्षात धरणाला पडलेले तडे बुजवण्यासाठी घळ भरतीचे काम झाल्याने यंदा पाण्याचा साठा तुलनेने जास्त वाटत असला तरी पाणी केवळ साठवून ठेवून सुरक्षित ठेवणे पुरेसे नसून गरजवंतांना या पाण्याचा उपयोगही होणे गरजेचे आहे.
सद्य:स्थितीत ग्रामस्थांना या पाण्याचा काहीही उपयोग नाही. दुसरीकडे धरणाचे खालील नदी व नाले व त्याचबरोबर विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे. कालव्याचे काम पूर्ण नसतानाही चिंचाळी धरणाचे सांडव्याचे क्षेत्रात व धरणाखाली दुबार पीक घेतले जाते. विशेषत: कलिंगडाची शेती मोठया प्रमाणावर केले जाते. गेल्या हंगामात मान्सूनची अवकृपा झाल्याने धरणाच्या पाणीसाठयाचा गावांना मोठा आधार आहे.
धरणाचे पाणी शेतीसाठी वापरता यावे, यासाठीही येथील शेतकरी अनेक वर्षे आग्रही आहेत; मात्र प्रशासकीय अनास्था व लालफितीच्या कारभाराचा फटका तालुक्यात मोठया धरण प्रकल्पास बसल्याने ३० वर्षे झाली तरी प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित होऊ शकलेला नाही. निदान टंचाईच्या काळात तरी धरणाचे पाणी ग्रामस्थांना मिळावे, ही माफक अपेक्षाही यंदा पूर्ण झालेली नाही.