राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारने माध्यमिक शाळेतील अभ्यासक्रमात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा धडा काढून टाकला. राजस्थानात भाजपाचे सरकार आहे. राजस्थान सरकारपासून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने एक पाऊल पुढे टाकले. राजस्थान सरकार माध्यमिक शाळेतील नेहरूंचा धडा काढून टाकतो काय? तर आम्ही महाविद्यालयातील शिक्षणक्रमातून नेहरूंचा धडा काढून टाकतो की नाही बघा? अशी स्पर्धा करून नेहरूंवरील धडा काढून टाकण्यात आला.
आता हा कोणी काढला, तावडे महाराज म्हणतात, याची चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समिती आता बसेल, मग त्या चौकशी समितीचे सदस्य ‘धडा कोणी काढला रे’ याची चौकशी करत फिरतील. चौकशी समितीच्या बैठका होतील, मग त्याचा अहवाल सादर करतील, तो तावडेंच्या टेबलावर जाईल, तावडे तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील, यासाठी दोन-तीन वर्षे जातील. मध्यंतरी एका शाळेमध्ये शाळा तपासनीस आले. ते एका वर्गात शिरले, वर्गात तास चालू होता इतिहासाचा.
शाळा तपासनीसांनी एका विद्यार्थ्यांला प्रश्न विचारला, ‘दिल्लीचं तख्त कोणी फोडलं रे?’ तो विद्यार्थी घाबरला, तो गयावया करून म्हणाला, ‘मी नाही फोडलं सर’ शाळा तपासनीसांनी वर्गशिक्षकाकडे तक्रार केली. वर्गशिक्षक शाळा तपासनीस साहेबाला म्हणाले, ‘तो मुलगा अत्यंत सरळ आहे, तो अशी तोडाफोडीची कामे करणार नाही’ शाळा तपासनीसांनी हेडमास्तरांकडे तक्रार केली. हेडमास्तरांनी तपासनीसाला सांगितले की, ‘तो आपटे गुरुजींचा वर्ग ना, त्या वर्गातील मुलं काही करणार नाहीत याची हमी मी देतो’ शाळा तपासनीसाने हा सगळा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला.
सरकारच्या टेबलावर अहवाल गेल्यानंतर तक्रारीत तोडफोडीचा विषय आहे हे पाहून त्यावेळच्या शिक्षणमंत्र्यांनी तो अहवाल बांधकाम खात्याकडे पाठवला. बांधकाम खात्याने साधकबाधक विचार केला, विषय गंभीर आहे हे त्यांच्या लक्षात आले. परंतु घटना जी काही घडली, ते गाव महाराष्ट्राच्या बाहेर आहे म्हणून फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली. मुख्यमंत्र्यांनी फाईल वाचली आणि दिल्लीच्या तख्ताचा विषय असल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या कक्षेतला हा विषयच नाही, असा लाल शाईत शेरा मारून मुख्यमंत्र्यांनी ही फाईल दिल्ली सरकारकडे पाठवली.
दिल्ली सरकारने एक समिती नेमली आणि त्या समितीला चौकशी करायला सांगितली. समितीने चौकशी करण्याकरिता चार वर्षे घेतली. नंतर समितीचा अहवाल आला. त्या अहवालात अशी शिफारस होती की, दिल्लीचे तख्त फोडण्याबद्दल हिंसक प्रश्न विचारणा-या शाळा तपासनीसाला गडचिरोली जिल्ह्यात बदली करून पाठवा.
सरकारी यंत्रणा कसं काम करते याचा हा नमुना आहे! ‘नेहरूंचा धडा’ हे प्रकरण दिल्लीचं तख्त कोणी फोडलं? या प्रश्नासारखंच आहे. खरं तर मुंबई विद्यापीठाने हा धडा कोणी काढला, याची चौकशी करण्याचे काही कारण नाही. विद्यापीठाने हे गृहीत धरले पाहिजे भाजपाचे राज्य देशात आणि राज्यात आल्यामुळे काँग्रेसने दिलेला स्वातंत्र्याचा लढा, महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, खान अब्दुल गफार खान आदी सर्व नेत्यांबद्दलचे सर्व धडे बेशक काढून टाकले जाणार आहेत.
जर या देशातून काँग्रेसच संपवायची आहे तर, काँग्रेस नेत्यांचे धडे शालेय पुस्तकात ठेवून कसं चालेल. शाळेत किंवा महाविद्यालयात शिकणा-या मुलांना देशाचं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोण लढलं, हे समजताच कामा नये. गांधीचा करो या मरो, चले जाव लढा काय होता? ज्या पंडित नेहरूंचा धडा पुस्तकांतून काढून टाकण्यात आला हे घरचे प्रचंड श्रीमंत असलेले नेहरू आपल्या अंगावर खादीचा जाडाभरडा कपडा चढवून स्वातंत्र्य लढयात सामील होतात हे शाळेच्या विद्यार्थ्यांना समजून कसे चालेल? हे विद्यार्थी मतदार झाल्यावर गांधी-नेहरूंच्या लढयाचा परिणाम झाला, काँग्रेसने स्वातंत्र्याची लढाई लढवली या विचाराचा परिणाम झाला आणि त्यांनी जर हाताच्या चिन्हाचे बटन दाबले तर मग कमळाबाईचं कसं होईल? आणि म्हणून संघ परिवारात वेगवेगळया ठिकाणचे राम आणि माधव आहेत. त्यांच्या डोक्यातून या सुपीक कल्पना बाहेर आल्यात.
उद्याचे मतदार भाजपाच्या बाजूने व्हायचे असतील तर काय काय केले पाहिजे, त्यातला पहिला धडा असा की, स्वातंत्र्याचा काँग्रेसचा लढा, चले जावची चळवळ, गांधी-नेहरूंचा त्याग हे पाठपुस्तकातून हद्दपार केलं पाहिजे. पहिला धडा असा ठरवला गेला की, प्रथम शिक्षणक्रमातून काँग्रेस हद्दपार करा, मग गांधीचा धडा असेल, नेहरूंचा धडा असेल, स्वातंत्र्याची चळवळ असेल हा सगळा इतिहास पूर्णपणे पुसून टाका. त्यानुसार राम माधव नावाच्या समितीने देशभरातील पाठपुस्तकांमध्ये कुठे गांधी दिसतात, कुठे नेहरू दिसतात, कुठे ४२ची चळवळ दिसते आहे का, याचा शोध सुरू केला आहे.
शिक्षणक्रमातील सर्व पुस्तके घेऊन भाजपाची ही बौद्धिक देणारी विचारसमिती प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये बसलेली आहे. अभ्यासक्रमाच्या सर्व पुस्तकांची तपासणी जोरात सुरू आहे. ज्या पुस्तकात महात्मा गांधी दिसले की पान फाडून टाक, नेहरू दिसले रे दिसले त्यांचे पानाचे तुकडे तुकडे करून टाक.
स्वातंत्र्याच्या चळवळीचा आणि काँग्रेसचा कुठे संबंध की ते पुस्तक फाडून टाक, असा धडाका सुरू आहे. एकदा का हे सगळे धडे काढून टाकले आणि फाडून टाकले की मग भाजपाची राम माधव, जावडेकर समिती बंद खोलीत बैठक मारून बसेल आणि मग नवीन धडे कसे लिहायचे, याची सुरुवात होणार आहे. देशातल्या सगळया भाषेतल्या शिक्षणक्रमात ते धडे येणार आहेत.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारीसाठी जे धडे येतील, देश पारतंत्रात असताना ब्रिटिशांचा युनियन जॅक, हेडगेवार खाली उतरवत आहेत, आणि दुस-या हाताने तिरंगा फडकवत आहेत, असा एका धडा घातला जाणार आहे. मग ब्रिटिश पोलिसांची फौजफाटा असलेली पोलीस गाडी घटनास्थळी येते आणि लाठीमार सुरू करते त्या लाठीमारात गोळवलकर गुरुजी जखमी झालेले आहेत, भैयाजी दाणींना मार पडला आहे, भैयाजी जोशींच्या डोक्याला जखम झाली आहे, बाळासाहेब देवरस पोलिसांचं कडं तोडत आहेत, के. सुदर्शन यांना पोलीस पायदळी तुडवित आहेत, बलराज मधोक यांना लाठी लागलेली आहे. बच्छराज व्यास यांना पोलीस फरफटत नेत आहेत.
स्वातंत्र्य मिळेपर्यंत दिनदयाळ उपाध्याय बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत, अशी चित्रं काढायची ऑर्डर दिलेली आहे. ते काम एकदा पुरे झाले की, नव्याने संघ परिवार तो सगळा इतिहास पुन्हा तपासणार, मोदींकडे पाठवणार, त्यात चुकूनसुद्धा वाजपेयी, आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावे येऊ नयेत याची खबरदारी संघ परिवाराने घेतली आहे.
नाहीतर संतापलेले मोदीबाबा हाच धडा काढून टाकण्याचे आदेश द्यायचे. त्यामुळे राम माधव यांना भैय्याजी जोशी यांनी सांगून ठेवले आहे की, इतिहास कसा लिहायचा, हा धडा समजून घ्या. मोदींची आवड निवड समजून घ्या आणि त्यानुसार नवा इतिहास निर्माण करून ज्या विद्यार्थ्यांचा जन्म १९४७नंतर झालेला आहे त्या पाठक्रमात १५ ऑगस्ट १९४७ला स्वतंत्र भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर नरेंद्रकुमार दामोदर मोदी यांनी फडकवला, असे धडे घालण्याची तयारी सुरू आहे. फक्त तो धडा ४७च्या नंतरच्या विद्यार्थ्यांकरिता असेल.
या सगळया खटाटोपात गांधी-नेहरूंचा धडा काढला म्हणून कोणी हळवे होऊ नये. मोदींच्या सत्ता असेपर्यंत काही इतिहास संशोधक असाही शोध लावणार आहेत की, इतिहासातला राणा प्रताप आणि पौरस हे आताचे मोदीच आहेत. त्यामुळे गांधी-नेहरूंचा धडा काढला म्हणजे त्यांचे वादातीत महत्त्व कमी होईल असा आसुरी आनंद या मंडळींना मिळत असेल तर मिळून द्यावा. धडे काढून काही फरक पडणार नाही. यांना धडे शिकवायचे मार्ग वेगळे आहेत.