नासिक – दिंडोरी तालुक्यातील जवळपास सर्व गावांमध्ये आठ दिवसांपासून पावसाचा तडाखा कायम असून, ढगफुटीसारख्या पावसाने शेतक-यांची पुरती झोप उडवली आहे. द्राक्ष, भाजीपाला व खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुसळधार पावसाने द्राक्षबागेत उताराच्या दिशेने पाणी वाहत जमिनीतील माती, पिके वाहून गेली. द्राक्षबागांना नाले, ओहोळचे स्वरूप प्राप्त झाले होते.
काढणीला आलेले सोयाबीन, भात, मका, भुईमूग आदी खरिपाची पिके, कोबी, टोमॅटो, भाजीपाला पाण्यात गेला आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतक-यांकडून शेतातील पाणी काढण्यापासून तर चिखलात फवारणी करण्यासाठी द्राविडी प्राणायाम सुरू आहे. पावसामुळे वीजपंप बंद असतानाही ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरू असल्याने शेतक-यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. औषध फवारणीचा, लोडशेडिंगचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. एवढय़ा मोठय़ा नैसर्गिक आपत्तीत सरकारकडून कोणताही मदतीचा हात, धीर वा दिलासा मिळत नसल्याने शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
वाहतूक मार्ग बंद
कोराटे, मोहाडी, आक्रळे, वनारवाडी आदी भागांत तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील पाणी थेट रणथळ परिसरात नाशिक-कळवण रस्त्यावर येत चार वेळा रस्ता बंद झाला, तर दिंडोरी- मोहाडी रस्त्यावर कोराटे शिवारातही नाल्याला मोठा पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे तीन वेळा वाहतूक बंद झाली. बाणगंगा नदीला तीन वेळा मोठा पूर आल्याने मोहाडी-जानोरी रस्ता काही काळ बंद राहिला. शिंदवड परिसरातही मोठे नुकसान झाले आहे.