गुजरातमधील जामनगर येथे सरावादरम्यान भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरमध्ये टक्कर झाल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला.
जामनगर- गुजरातमधील जामनगर येथे सरावादरम्यान भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरमध्ये टक्कर झाल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात हवाई दलाचे पाच अधिकारी आणि अन्य कर्मचा-यांचा समावेश आहे. सरमत हवाईतळाजवळ गुरुवारी दुपारी 12 वाजता हा अपघात झाला.
दोन्ही अपघातग्रस्त हेलिकॉप्टर रशियन बनावटीची ‘एमआय-17’ या प्रकारातली असून, ग्वाल्हेर येथील हवाई दलाच्या ‘टीएसईडी’ विभागातील ती होती. उड्डाण केल्यानंतर पाच मिनिटांतच दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये टक्कर होऊन हा अपघात झाला. खाली कोसल्यानंतर या हेलिकॉप्टरांनी पेट घेतला. दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांच्या इतकी जवळ कशी आली, अशी विचारणा केली असता हा सरावाचाच एक भाग असतो, अशी माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिली.
या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे अधिकारी, पोलिस आणि जामनगर अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. मृतांमध्ये तीन विंग कमांडर, एक स्क्वाड्रन लिडर आणि फ्लाइट लेफ्टनंट या अधिका-यांसह तीन सरजट आणि एका ज्युनिअर वॉरंट ऑफिसरचा समावेश आहे. अपघातात बळी पडलेल्यांचे मृतदेह हवाई दलाच्या अधिका-यांनी ताब्यात घेतले असून, या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
वर्षभरातील चौथा अपघात
हवाई दलाच्या विमानांचा अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून वर्षभरातील हा चौथा अपघात आहे. मात्र दोन हेलिकॉप्टरची एकमेकांशी धडक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या तीन वर्षात अपघातांमुळे हवाई दलाला 33 लढाऊ विमाने गमवावी लागली आहेत. या अपघातांमध्ये 13 वैमानिकांसह 26 लष्करी कर्मचारी आणि सहा नागरिकांना प्राण गमवावे लागले.