मुंबईची तहान भागवणा-या शहापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षानंतर कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करूनही पाणीटंचाई कायम आहे.
शहापूर – मुंबईची तहान भागवणा-या शहापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षानंतर कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करूनही पाणीटंचाई कायम आहे. गेल्या सहा वर्षात पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने १ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपयांचा निधी खर्ची घातला असला तरी गाव-पाडय़ातील पाणीटंचाई दूर झालेली नाही.
तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आजमितीस सुमारे १९६ पाणी योजना राबवण्यात आलेल्या असताना त्यातील केवळ ४० ते ५० योजना या पूर्ण झाल्या आहेत. योजना अर्धवट राहण्यामागे योजनांचे ढिसाळ नियोजन, निकृष्ट साहित्य आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत त्या सापडल्या आहेत.
तर काही कंत्राटदारांनी या योजनेचे काम वेळेवर न केल्याने त्यांचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला आहे. त्यामुळे या योजना पूर्ण करण्यासाठी पुन्हा योजनेच्या खर्चाएवढाच निधी लागणार असल्याने या योजनांच्या पूर्ततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या योजना पूर्णत्वाकडे नेण्याचा व बंद योजना दुरुस्त करून कार्यान्वित केल्या जाणार असल्याचे गटविकास अधिकारी खंदारे यांनी सांगितले असले तरी योजनांना कायमस्वरूपी पाण्याचा स्त्रोत नसल्याने या योजना कितपत पाणीटंचाई दूर करतील, हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक पाणी योजनांचे वीजबिल थकित आहे.
विद्युत पंप नादुरुस्त आहेत. पर्यायी वीज पंपाची व्यवस्था नाही. तर अनेक योजना वीज पुरवठय़ाअभावी बंद असल्याची माहिती देण्यात आली. तर अर्धवट योजना ग्रामपंचायतीने ताब्यातच घेतल्या नसल्याने पाणीटंचाई कशी दूर होणार, असा सवाल नागरिकाकडून उपस्थित होत आहे.