तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन रहदारीचा महत्त्वाचा असा दोडामार्ग-तिलारी राज्यमार्ग पुन्हा एकदा ‘खड्डय़ात’ गेला आहे.
तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन रहदारीचा महत्त्वाचा असा दोडामार्ग-तिलारी राज्यमार्ग पुन्हा एकदा ‘खड्डय़ात’ गेला आहे. शिवाय पर्यायी मार्गावर वाढलेली झाडी आणि जागोजागी राज्यमार्गावर गुडघाभर साचणारे पाणी यामुळे निम्म्या तालुक्यातील नागरिकांना जीव टांगणीला ठेवूनच या मार्गावरून प्रवासास सामोरे जावे लागते आहे.
याच मार्गादरम्यान रस्त्यावरूनच नदीसारखे धावणारे पाणी दोडामार्ग-तिलारी राज्यमार्ग हा नेमका वाहतुकीचा मार्ग तरी आहे का? असा सवाल नागरिक व सा. बां. च्या नाकर्तेपणामुळे वाहनचालक आणि तालुक्यातील जनतेला सतावतो आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची तर अक्षरश: वाताहत झाली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील एकूण ५९ पैकी किमान ४० गावांची तालुका ठिकाणच्या दैनंदिन रहदारीचा एकमेव मार्ग म्हणजे दोडामार्ग-तिलारी राज्यमार्ग होय. दोडामार्ग ते तिलारी १८ कि.मी. आणि त्यापुढे विजघपर्यंत १२ कि.मी.चा राज्यमार्ग आहे. तालुक्यात बांदा-दोडामार्ग-आयी आणि तिलारी-मोर्ले-पारगड हेही अन्य दोन राज्यमार्ग आहेत. मात्र सर्वासाठी दोडामार्ग ते तिलारी हा राज्यमार्ग तालुका ठिकाण गाठण्याचा प्रमुख मार्ग आहे.
मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नाकर्तेपणामुळे दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गाचा नादुरुस्तीचा ‘आजार’ बरा होणे अवघड बनले आहे. गतवर्षीच्या पावसात तर दोडामार्ग ते तिलारी राज्यमार्गाच्या अक्षरश: चिंधडय़ा उडाल्या होत्या. १८ कि.मी.च्या राज्यमार्गावर हजारोंच्या संख्येत खड्डय़ांचे साम्राज्य पसरले होते. मात्र वर्षभर लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या प्रखर आंदोलनानंतर सा. बां.च्या काही कर्तव्यदक्ष अधिका-यांनी अति नादुरुस्त झालेल्या राज्यमार्गावर ‘कारपेट’ डांबरीकरण करून घेतले.
वास्तविकता संपूर्ण रस्ता वाहतुकीस नादुरुस्त झाला असताना कोनाळकट्टा ते आवाडे आणि झरेबांबर ते आंबेली या दरम्यान एकूण १८ कि.मी. राज्यमार्गापैकी फक्त पाच ते सहा कि. मी. चे नूतनीकरण चालू वर्षीच्या एप्रिल-मेमध्ये पूर्ण करण्यात आले. मात्र उर्वरित १२ कि.मी. रस्ता तसाच राहिला.
अगोदरच नादुरुस्त झालेला हा उर्वरित राज्यमार्ग पावसाला सुरुवात होताच पुन्हा एकदा वाहतुकीस ‘जर्जर’ झाला आहे. तर रस्त्याचे काही ठिकाणी नूतनीकरण करूनही गटार उघडे करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले नाही. त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे चालूवर्षीही राज्यमार्गावरील गटार समस्येने उग्ररूप धारण केले आहे. जागोजागी पडलेले खड्डे आणि ठिकठिकाणी साचणारे गुडघाभर पाणी यामुळे वाहनचालकांना अक्षरश: जीव मुठीत ठेऊन वाहने हाकावी लागत आहेत.
दोडामार्ग-तिलारी मार्ग समस्यांच्या आजाराने अक्षरश: जर्जर बनला आहे आणि आजारी राज्यमार्ग नागरिक व वाहनचालक यांना जीवघेणा ठरणार आहे. त्यामुळे सा. बां. या आजारी रस्त्यावर दुरुस्तीचे तातडीने उपचार करणे आवश्यक आहेत.